बदलत्या हवामानाचा परिणाम, उत्पादक संकटात : सततच्या वादळी पावसामुळे मोहोर झडून नुकसान
प्रतिनिधी /बेळगाव
यंदा बदलत्या हवामानामुळे आणि सतत होत असलेल्या पावसामुळे काजू उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे काजू उत्पादक संकटात सापडले आहेत. आधीच कोरोनामुळे मागील दोन वर्षात काजूची विक्री सुरळीत झाली नाही. त्यातच यंदा लागवड कमी झाल्याने उत्पादक चिंतेत सापडले आहेत.
बेळगाव आणि खानापूर तालुक्मयात काजूचे उत्पादन अधिक प्रमाणात होते. मात्र यंदा हवामानात मोठय़ा प्रमाणात बदल झाल्याने लागवड लांबणीवर पडली आहे. तसेच लागवडीत ही मोठी घट झाली आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. विशेषतः मार्चपासून काजू लागवडीला प्रारंभ होतो. मात्र यंदा एप्रिल मध्यावर आला तरी अद्याप म्हणावी तशी लागवड झाली नाही. तसेच सतत होत असलेल्या वादळी पावसामुळे मोहोर झडून नुकसान होत आहे. त्यामुळेच लागवड कमी झाली आहे.
पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, बेळवट्टी, बडस, बिजगर्णी, राकसकोप, बाकनूर, कल्लेहोळ, उचगाव, तुरमुरी, अतिवाड आदी भागात विशेषतः काजूचे उत्पादन होते. मात्र यंदा काजू लागवडीवरच परिणाम झाल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. यंदा लागवडच कमी झाल्याने उत्पादकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
अद्याप भावही निश्चित नाही
काजूला साधारण 100 ते 150 रुपयांपर्यंत प्रतिकिलो भाव मिळतो. मात्र यंदा म्हणावे तसे उत्पादनच सुरू झाले नसल्याने अद्याप भावही निश्चित झाला नाही. ग्रामीण भागात असलेल्या आठवडी बाजारातून काजूची विक्री होते. मात्र उत्पादनालाच सुरुवात झाली नसल्याने बाजारातही विक्रीसाठी काजू दाखल झाली नाही.
उत्पादनावर परिणाम
हवामानाचा परिणाम काजू उत्पादनावर झाला आहे. विशेषतः खानापूर आणि बेळगाव तालुक्मयातच काजूचे उत्पादन होते. मात्र यंदा काजूला अनुकूल वातावरण नसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे.
– महांतेश मुरगोड (उपनिर्देशक बागायत खाते)