ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडानंतर गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता नाट्याला पूर्णविराम मिळाला असून शिंदे आणि भाजप यांनी मिळून सत्ता स्थापन केली आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्य संपत नाही तोच गोव्यात (Goa) काँग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण काँग्रेसला भाजपचा डाव उधळून लावण्यात यश आलं. भाजपमध्ये प्रवेश करणारे ८ आमदार काँग्रेस सोबतच राहिले. आता ऐन राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसनं त्यांच्या आमदारांना तामिळनाडूची राजधानी चेन्नईत हलवलं आहे.
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी पक्षांतर होण्याच्या शक्यतेमुळं कॉंग्रेसनं (Congress) त्यांच्या ११ पैकी पाच आमदारांना चेन्नईत हलवलं आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रातील सत्तानाट्य संपलेलं असतानाच आता गोव्यातही रिसॉर्ट पॉलिटिक्सला सुरुवात झाली आहे.
हे ही वाचा : गोव्यात भाजपचा डाव फसला! महाराष्ट्राप्रमाणे पक्ष फोडण्याचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप
कॉंग्रेसला आमदार फुटण्याची भीती?
राष्ट्रपतीपदाची निवडणुक तोंडावर असताना त्यात क्रॉस वोटिंग आणि पक्षांतर होण्याची भीती असल्यानं कॉंग्रेसनं गोव्यातील ११ पैकी पाच आमदारांनी चेन्नईत हलवलं आहे. या आमदारांमध्ये काँग्रेसचे उपनेते संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, रुडॉल्फ फर्नांडिस, एल्टन डिकॉस्टा आणि कार्लोस फेरेरा यांचा समावेश आहे. याशिवाय इतरही आमदार फुटू नयेत यासाठी कॉंग्रेस विशेष काळजी घेत असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो आणि इतर सहा आमदार गोव्यातच असून गोव्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता कॉंग्रेस नेतृत्वानं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह पाच आमदार कॉंग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. या आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेटदेखील घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु सावंत यांनी या वृत्ताचं खंडन केलं होतं. तसेच काँग्रेस नेते आणि गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी आमचा कोणताही आमदार भाजपमध्ये जाणार नसल्याचे म्हंटले होते.