जलवाहिनीची दुरुस्ती करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या विविध भागात जलवाहिन्यांना गळती लागून सांडपाणी मिश्रित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तानाजी गल्ली परिसरात गेल्या कित्येक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून याबाबत महापालिका आणि एलऍण्डटी कंपनीकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याने त्यांच्यावर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. सध्या शहर आणि उपनगरात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. अशातच दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. पाच दिवसांआड पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. पण काही भागात सांडपाणी मिश्रित पाणीपुरवठा होत आहे.
विशेषतः तानाजी गल्ली परिसरात गेल्या कित्येक महिन्यांपासून नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. सदर पाणी पिण्यासाठी पुरविण्यात येते. मात्र पाणी पाहता पिण्यालायक नसल्याची टीका नागरिक करीत आहेत. याबाबत महापालिका तसेच एलऍण्डटी कंपनी आणि व्हॉल्वमनकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. सध्या सर्वत्र विविध रोगराईचा प्रसार होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. अशी स्थिती निर्माण झाली असताना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील जलवाहिनीची दुरुस्ती करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.