उत्रे / वार्ताहार
उत्रे (ता.पन्हाळा) येथील डोंगराळ भागात निकमवाडी उदाळवाडी परिसरातील वांजुळे दरा नावाच्या शेतात गव्यांच्या कळपानं धुमाकूळ घातला आहे. गव्यांनी ऊस, मक्का,भुईमूग ,सूर्यफूल, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.गव्यांपासून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हवादील झाला आहे.वनखात्याचने या गव्यांचा बंदोबस्त करावा व नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तर या परिसरात दिवसाही गव्यांचा वावर वाढला आहे. गव्यांच्या भितीने शेतकरी शेतात जाण्यास टाळाटाळ करत असून शेतीचे कामे खोळंबली आहेत. उन्हाळा सुरु झाला असून ऊस पिकासह इतर पिकांना जादा पाण्याची गरज भासत आहे.शेतकरी मात्र रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेताकडे जात नाहीत.शेतकरी जीव मुठीत घेवून शेताकडे जात आहेत.त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापूर्वी वनविभागाने तातडीने याबाबत उपाययोजना राबवून कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.