कोगनोळी परिसरातील चित्र
वार्ताहर/कोगनोळी
कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी, आडी, बेनाडी, हदनाळ, आप्पाचीवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ के. एस आदी भागात यंदा उसाला मोठ्या प्रमाणावर तुरे फुटल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ लागल्याने शेतकरीवर्गाला आर्थिक फटका बसला आहे.
यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे पिकामध्ये कायम पाणी साचून राहत होते. त्यामुळेच उसाला अधिक प्रमाणात तुरे फुटले आहेत. अतिवृष्टीमुळे ऊस लवकर परिपक्व झाल्याचे हे लक्षण असल्याचे बोलले जात आहे. मात्र तुरे फुटल्यावर दीड महिन्यात ऊस न तुटल्यास पांगशा फुटून उसाचे उत्पादन घटते. सध्या बहुतांशी साखर कारखान्यांकडे ऊसतोड मजुरांची कमतरता भासत आहे. याचा परिणामही तोडणीवर झाला आहे. उशिरा ऊस तुटल्यास आणखी उत्पादन घटणार आहे. एकूणच अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पुन्हा ऊस उत्पादन घटल्याने नुकसानीत भरचं पडणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी तुरे फुटलेल्या उसाची लवकर उचल करावी अशी मागणी होत आहे.