वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारी येथे झालेल्या ब गटातील सामन्यात वैभव रावलचे शानदार शतक तसेच दिविज मेहराच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने बलाढय़ मुंबईचा 8 गडय़ांनी पराभव केला. 2023 च्या रणजी हंगामातील दिल्लीचा हा पहिला विजय आहे. अन्य सामन्यात तामिळनाडूने आसामचा तर आंध्रप्रदेशने सौराष्ट्रचा पराभव केला.
दिल्ली संघाने मुंबईवर हा पहिला निर्णायक विजय मिळविला आहे. यापूर्वी म्हणजे 1979-80 च्या रणजी स्पर्धेतील अंतिम सामन्यात बिशनसिंग बेदीच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने सुनील गावसकरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाचा 240 धावांनी दणदणीत पराभव करून रणजी करंडकावर आपले नाव कोरले होते.
ब गटातील या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 293 धावा जमविल्यानंतर दिल्लीने पहिल्या डावात 369 धावा जमवित मुंबईवर 76 धावांची आघाडी घेतली होती. पण त्यानंतर दिल्लीच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईचा दुसरा डाव 170 धावात आटोपला. दिल्लीला निर्णायक विजयासाठी 97 धावांची जरुरी होती आणि त्यांनी 2 बाद 97 धावा जमवित हा सामना 8 गडय़ांनी जिंकला. मुंबईच्या दुसऱया डावात कर्णधार रहाणेने 51 तर कोटियानने नाबाद 50 धावा झळकविल्या. दिल्लीतर्फे दिविज मेहराने 30 धावात 5 गडी बाद केले. दिल्लीच्या दुसऱया डावात वैभव शर्माने 36 तर शोकेनने 36 धावा जमविल्या. रणजी स्पर्धेच्या गुणतक्त्यात आता दिल्लीने 11 तर मुंबईने 23 गुण घेतले आहेत. या पराभवामुळे मुंबई संघाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी अधिक झगडावे लागेल.
या स्पर्धेतील चेन्नई येथे झालेल्या सामन्यात तामिळनाडूने आसामचा 1 डाव आणि 70 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात तामिळनाडूने पहिल्या डावात 540 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर आसामचा पहिला डाव 266 धावात आटोपला. फॉलोऑन स्वीकारल्यानंतर आसामने दुसऱया डावात 204 धावा केल्याने त्यांना हा सामना मोठय़ा फरकाने गमवावा लागला. स्पर्धेच्या गुणतक्त्यात तामिळनाडूने 15 तर आसामने 11 गुण घेतले आहेत.
राजकोटमध्ये झालेल्या या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात आंध्रने सौराष्ट्रचा 150 धावांनी पराभव केला. या सामन्यात आंध्रने पहिल्या डावात 415 धावा जमविल्या. त्यानंतर सौराष्ट्रचा पहिला डाव 237 धावात आटोपला. आंध्रने आपला दुसरा डाव 7 बाद 164 धावांवर घोषित केला. सौराष्ट्रने दुसऱया डावात 192 धावांपर्यंत मजल मारल्य़ाने त्यांना हा सामना 150 धावांनी गमवावा लागला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आंध्रने 19 तर सौराष्ट्रने 26 गुण नोंदविले आहेत.
संक्षिप्त धावफलक
मुंबई प. डाव 293, दिल्ली प. डाव 369, मुंबई दु. डाव 170, दिल्ली दु. डाव 2 बाद 97.
तामिळनाडू प. डाव 540, आसाम प. डाव 266, आसाम दु. डाव 204.
आंध्र प. डाव 415, सौराष्ट्र प. डाव 237, आंध्र दु. डाव 7 बाद 164 (डाव घोषित), सौराष्ट्र दु. डाव 192.