मंत्री फळदेसाईंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रतिनिधी / कुडचडे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील असंवेदनशील आणि शेतकरीविरोधी भाजप सरकारने शेळ-मेळावली येथील शेतकऱयांनी शेतजमिनी वाचवण्यासाठी केलेल्या आंदोलनातून धडा घेतला नसल्याचे दिसून येत आहे. आपली सुपीक जमीन वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱया सांगेतील शेतकऱयांचे आंदोलन चिरडण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. शेतकऱयांच्या भावनांशी खेळू नका असा इशारा आपण मुख्यमंत्र्यांना देतो. कष्टकरी शेतकरी पेटून उठल्यास सांगेमध्ये शेळ-मेळावलीची पुनरावृत्ती अटळ आहे, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला आहे.
समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगे येथील आंदोलन थांबवण्याच्या शेतकऱयांना दिलेल्या इशाऱयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना पाटकर म्हणाले की, सांगेतील शेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यभरातील लोकांना घेऊन तेथे जाईल व शेतकऱयांचे हित राखेल. काँग्रेसने सरकारला केरी-सावईवेरे येथे उपलब्ध असलेली जमीन, जी यापूर्वी नायलॉन-66 प्रकल्पाला देण्यात आली होती, ती आयआयटीसाठी वापरण्याची सूचना केली होती. सेझ प्रवर्तकांकडून परत घेतलेली जमीन आयआयटीसाठी वापरावी अशी विनंतीही आम्ही सरकारला केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्य सरकार शेतकऱयांचा आवाज दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजेंडा पुढे ढकलण्यासाठी सुपीक जमिनींचे काँक्रिटच्या जंगलात रूपांतर करण्यास तयार असल्याचे दिसून येते, अशी टीका पाटकर यांनी केली आहे. त्याचबरोबर समाजकल्याणमंत्र्यांचा त्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱयांना धमकावणारा इशारा वाचून आपल्याला आश्चर्य वाटले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना ही धमकी दिली जाणे हे अधिक चिंताजनक आहे. मंत्र्यांनी दिलेल्या धमकीची डीजीपींनी गांभीर्याने दखल घ्यावी. अशी वक्तव्ये केल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. म्हणून त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाटकर यांनी केली आहे.