शाळा पाडण्यासंदर्भात एसडीएमसीतर्फे निवेदन देऊनही दुर्लक्ष : दुर्घटना घडल्यास बांधकाम-शैक्षणिक खात्याच्या अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करणार
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यातील कबनाळी येथील 80 वर्षापूर्वीची उच्च प्राथमिक शाळा कमकुवत आणि जीर्ण झाली असून ही इमारत धोकादायक बनली आहे. इमारत पाडण्यात यावी, यासाठी अर्ज विनंत्या करुनदेखील सार्वजनिक बांधकाम व शिक्षण खाते एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे काम करत आहेत. जर एखादी दुर्घटना घडल्यास दोन्ही खात्याच्या अधिकाऱयांवर गुन्हा नोंदविण्याचा इशारा ग्रा. पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी दिला आहे.
कबनाळी शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. एकूण 40 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या धोकादायक इमारतीच्या बाजूला नव्याने शाळा बांधण्यात आली आहे. मात्र या शाळेत वर्ग बसवण्यास अद्याप शासनाकडून अनुमती दिलेली नाही. इमारत शाळेच्या वेळेत कोसळल्यास फार मोठा अनर्थ घडू शकतो. यासाठी शाळा सुधारणा कमिटीने आतापर्यंत दोनवेळा इमारत पाडण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन येथील तालुका शिक्षणाधिकाऱयांना दिले होते. यावेळी इमारत पाडण्याचा अधिकार सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असल्याने ही कारवाई सार्वजनिक बांधकाम खातेच करू शकते. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अर्ज करावा, असे सांगण्यात आले. बांधकाम खात्याकडे मे महिन्यात रितसर अर्ज करण्यात आला आहे. मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्याप साधी पाहणीसुद्धा केली नाही. यामुळे या इमारतीचा धोका असतानादेखील अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंदर्भात कोणतीही दुर्घटना घडल्यास बांधकाम व शिक्षण खात्याच्या अधिकाऱयावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा या भागातील ग्रा. पं. सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विनायक मुतगेकर यांनी दिला आहे.
‘तरुण भारत’शी बोलताना ते म्हणाले, आम्ही कबनाळी येथील जीर्ण झालेली इमारत पाडण्याची मागणी करत असताना याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र मुगवडे येथील दहा वर्षापूर्वी बांधलेली चांगली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. याला काय म्हणावे ? यावरुन अधिकाऱयांचा हेतू स्पष्टय् होत आहे. येत्या आठ दिवसात ही इमारत पाडवून नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत वर्ग भरविण्यासाठी अनुमती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.