पोलीस महानिरीक्षकांचे काश्मिरी हिंदूंना आवाहन
वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी मंगळवारी काश्मिरी हिंदूंना काश्मीर न सोडण्याचे आवाहन केले आहे. काश्मीरमधून पलायन करत दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांचा कट यशस्वी होऊ देऊ नका. आगामी काळात हिंदूंच्या सुरक्षेत मोठी सुधारणा झालेली दिसून येईल. दहशतवाद्यांच्या अजेंडय़ाला बळ मिळेल अशाप्रकारची वक्तव्ये काश्मिरी हिंदूंनी करू नयेत असे आवाहन विजय कुमार यांनी केले आहे.
शेखपोरा बडगाम येथे मागील 5 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या काश्मिरी हिंदूंशी पोलीस महानिरीक्षकांनी संवाद साधला. काश्मीरमध्ये कुठलाच अल्पसंख्याक राहू नये, काश्मिरी हिंदूंनी येथून निघून जावे अशी दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांची इच्छा आहे. परंतु काश्मिरी हिंदूंनी काश्मीरमध्ये रहावे असे त्यांनी म्हटले आहे.
दहशतवाद्यांनी मागील आठवडय़ात शासकीय कर्मचारी असलेल्या राहुल भट यांची हत्या केली होती. राहुल भट हे बडगामच्या संग्रामपोराचे रहिवासी होते. पंतप्रधान रोजगार पॅकेज अंतर्गत 2010 मध्ये त्यांना नोकरी मिळाली होती. काश्मिरी पंडितांसाठी शेखपोरा येथे निर्माण करण्यात आलेल्या वसाहतीत ते राहत होते. राहुल यांच्या हत्येनंतर काश्मिरी हिंदूंमध्ये प्रचंड संताप आहे. स्वतःच्या सुरक्षेची उपेक्षा झाल्याचे म्हणत त्यांनी काश्मीर सोडण्याचा इशारा दिला आहे. शेखपोरामध्ये काश्मिरी हिंदू मागील 5 दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी ओळखून त्या दूर केल्या जात आहेत. सर्व काश्मिरी हिंदूंच्या सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात येत आहे. आगामी काळात लोकांना सुरक्षेतील ही सुधारणा दिसून येणार असल्याचे पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले आहे.
काश्मीरसह प्रदेशाच्या प्रत्येक हिस्स्यातील दहशतवाद्यांचे जाळे पूर्णपणे नष्ट करू. याकरता दहशतवादविरोधी मोहीम सातत्याने सुरू आहे. पोलीस, सैन्य आणि स्थानिक लोकांनी मिळून दहशतवादविरोधी लढायचे आहे. काश्मिरी हिंदूंवर हल्ले करून त्यांना काश्मीरबाहेर काढण्याचा दहशतवाद्यांचा कट असून तो आम्ही कदापिही यशस्वी होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले.