तब्बल 21 लाख लिटर पाणी वाया : छत्तिसगडमधील अधिकाऱ्यांच्या प्रतापाने संताप : संबंधित अधिकारी अखेर निलंबित
वृत्तसंस्था /कांकेर
छत्तिसगडमधील कांकेर जिह्यातील पखांजूरमध्ये एका धरणातून तीन दिवस सतत पाणी काढले जात होते. 30 एचपीचा पंप 3 दिवस रात्रं-दिवस चालू ठेवून धरण खाली करण्यात आले. या ‘पाणा बहाओ अभियाना’चे सत्य जेव्हा उजेडात आले तेव्हा बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्का बसला. येथे सुट्टीसाठी आलेल्या अन्न अधिकाऱ्याचा मोबाईल पाण्यात पडला होता. हा मोबाईल सुमारे 96 हजार ऊपयांचा होता. लाखो लिटर पाणी वाया गेल्यानंतर अधिकाऱ्याचा मोबाईल सापडला. मात्र या काळात इतके पाणी वाहून गेले की दीड हजार एकर जमीन सिंचनाखाली आली असती. या घटनेची राज्यात बरीच चर्चा होऊ लागल्यानंतर आता संबंधित अन्न निरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. छत्तिसगडमधील कांकेरमध्ये एका अधिकाऱ्याने लाखभर रुपयांच्या मोबाईल फोनसाठी धरणाचे 21 लाख लिटर पाणी वाया घालवले. अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांनी मित्रांसोबत परळकोट येथे दौरा केला. पार्टी करत असताना त्यांचा मोबाईल पाण्यात पडला. ही घटना 21 मे रोजीची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आसपासच्या ग्रामस्थांनी व पाणबुड्यांनी मोबाईलचा शोध घेतल्यावरही तो सापडला नाही. त्यानंतर चार दिवस लागून धरणाचे पाणी उपसल्यानंतर अखेर मोबाईल मिळाला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी प्रियंका शुक्ला यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले. दुसरीकडे जलसंपदा विभागाच्या एसडीओंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यांना 24 तासात उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. धरणातून पाणी बाहेर काढण्यासाठी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या एसडीओची तोंडी परवानगी घेतल्याचा युक्तिवाद केला होता. धरणातून पाणी काढण्यासाठी अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांनी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता आपल्या पदाचा गैरवापर करत, कडक उन्हात लाखो लिटर पाण्याची नासाडी केली. हे त्यांचे असभ्य वर्तन असून त्याचे समर्थन केले जाऊ शकत नसल्याची चर्चा सध्या सर्वत्र आहे.