मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रतिपादन
कोल्हापूर प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना न्याय दिला. फुले, शाहू यांच्या विचाराचा वारसा डॉ. आंबेडकर यांनी पुढे नेला. सामाजिक, आर्थिक, शेती, पाणी व्यवस्थापन, शिक्षण आदी क्षेत्रात डॉ. आंबेडकर यांनी केलेले कार्य आजच्या तरूणांना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन मधुरिमाराजे छत्रपती यांनी केले.
एस. के. डिगे मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित भिम फेस्टिव्हल अंतर्गत समाजरत्न भिमक्रांती पुरस्कार वितरणप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे होते. डॉ. श्रीकृष्ण महाजन डॉ. शरद गायकवाड, डॉ. दिपा श्रावस्ती, वसंतराव मुळीक, तात्यासाहेब कांबळे, हेमलता शेदे, पी. डी. सरदेसाई, डॉ. बी. पी. चव्हाण, अस्मिता साबळे यांचा समाजरत्न भिमक्रांती पुरस्कार देवून सन्मान केला. तर डॉ. चंद्रकांत कुरणे व डॉ. अथर्व गोंधळी यांना ‘समाजरत्न भिमक्रांती विशेष आदर्श पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.
मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या कायद्याचे प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेत दिसते. डॉ. आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराज यांचा समतेचा विचार घटनेच्या माध्यमातून पुढे घेवून जाण्याचे काम केले. आज जगभर आंबेडकरांच्या विचाराचा सन्मान केला जातो. त्यांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने तरूणांनी जावून एक वेगळा आदर्श निर्माण करावा. अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष सदानंद डिगे यांनी आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक धोंडीराम कांबळे यांनी केले. आभार प्रशांत चुयेकर यांनी मानले. यावेळी अशोक भास्कर, आंबेडकरप्रेमी उपस्थित होते.