माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे प्रतिपादन : चिकोडी येथे शिक्षक, वायव्य मतदारसंघातील उमेदवारांची प्रचारसभा
प्रतिनिधी /चिकोडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवस विश्रांती घेत नाहीत. कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घेऊन सतत परिश्रम घेवून या निवडणुकीत भाजपला अधिक प्रमाणात मतदान होईल, यासाठी प्रयत्न करावेत. विधान परिषदेच्या चारही जागा जिंकून परिषदेत भाजपचे बहुमत येणे आवश्यक आहे. परिषदेतील परावलंबित्व कमी करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. 1994-95 पर्यंतच्या शाळांना अनुदान देणे, पाचवे व सहावे वेतन आयोग, 4500 जेओसी शिक्षकांना, मोरारजी देसाई शाळेच्या शिक्षकांना सेवेत कायम करणे, कोरोना काळात सरकारी नोकरांचे वेतन विनाकपात देणे, विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना 5 हजार रुपयांची मदत देणे आदी भाजपच्या सत्ताकाळात शिक्षकांच्या अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. त्यामुळे सूज्ञ शिक्षक व पदवीधर मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केले.
चिकोडी येथे वायव्य पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी काँग्रेस उमेदवार लॅपटॉप व दहा हजार रुपये देणार अशी अफवा आहे. काँग्रेसवाल्यांनी आजवर प्रत्येक निवडणुकीत असेच केले आहे. त्याचेच फळ त्यांना भोगावे लागत आहे. त्यांनी कितीही आमिषे दाखवली तरी पदवीधर व शिक्षक हे बुद्धिमान मतदार त्यांना मतदान करणार नाहीत, असा आपल्याला विश्वास आहे. केवळ जाती-जातीत भांडणे लावून व मतदानासाठी सार्वजनिकांचा वापर करणाऱया काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवावे. स्थानिक पातळीवर फारसा विचार न करता देशाचे खंबीर नेते नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व जगात भारताचा नावलौकिक वाढीसाठी भाजपला मतदान करावे, असे आवाहन केले.
मंत्री उमेश कत्ती यांनी ग्राम पंचायत नंतर जिल्हा पंचायत, विधान परिषद, विधानसभा, लोकसभा या सर्व राजकीय सत्ता उपभोगणाऱया काँग्रेस उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी विश्रांती घेण्यासाठी माघारी पाठविले. शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांना केवळ राजकारण हा एकच व्यवसाय असल्याने ते पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. भाजपमध्ये 70 वर्षावरील सर्व नेत्यांना घरी पाठवितात तर काँग्रेस नेते उमेदवारी देतात. हा दोन्ही पक्षांमधील फरक आहे. ते शिक्षक व पदवीधर दोन्हीही नाहीत. अशा उमेदवाराला विजयी करू नका. योग्य उमेदवार न मिळाल्याने काँग्रेसला असे उमेदवार उभे करावे लागले आहेत. राजकीय पुनर्वसनासाठी धडपडणाऱया नेत्यांना राजकारणात पुन्हा संधी देऊ नका, असे आवाहन केले.
माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बोलताना विधानसभेतील कोणत्याही निर्णयावर विधानपरिषदेतील सदस्य कायदा व हित जोपासून निर्णय घेतात. चिंतकांची चावडी म्हणून त्याला नाव आहे. शिक्षक व बुद्धिवंत पदवीधर असे उमेदवार तेथे जाणे आवश्यक आहे. अनेक सत्ता उपभोगल्यानंतर मतदारांनी ज्यांना घरी बसवले, त्यांनी विश्रांती न घेता पुन्हा राजकीय प्रवेशाचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अशा वयोवृद्धांना विधान परिषदेत नव्हे तर निवारा केंद्रात पाठविणे आवश्यक असल्याचे सांगितले.
माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी शिक्षक व पदवीधरांच्या समस्यांचे निवारण करण्यास समर्थ असलेले उमेदवार भाजपकडे असून त्यांना मतदान करावे. शिक्षकांच्या समस्या भाजपच्या सत्ताकाळात सुटल्या आहेत. पूरग्रस्तांना घरकुले निर्माण करण्यासाठी 5 लाख रुपये, शिक्षकांच्या समस्या मार्गी लावणे अशी कामे भाजपच्या सत्ताकाळात झाली असल्याचे सांगितले.
यावेळी मंत्री शशिकला जोल्ले, वायव्य पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार हनुमंत निराणी, शिक्षक मतदार संघाचे उमेदवार अरुण शहापूर यांनी मनोगत व्यक्त केले. खासदार अण्णासाहेब जोल्ले, मंत्री मुरुगेश निराणी, आमदार दुर्योधन ऐहोळे, पी. राजीव, आमदार महेश कुमठहळ्ळी, माजी मंत्री शशिकांत नाईक, एन. रवीकुमार, वाय. नारायणस्वामी, उज्ज्वला बडवण्णाचे, माजी नगराध्यक्ष जगदीश कवटगीमठ, नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, उपनगराध्यक्ष संजय कवटगीमठ, संजय पाटील आदी उपस्थित होते.