धुळीमुळे व्यापारी हतबल : आश्वासनांची पूर्तता न केल्याने प्रवाशांतून संताप
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर शहरातून जाणारा बेळगाव-गोवा रस्ता जांबोटी क्रॉस ते गोवा क्रॉसपर्यंत पूर्णपणे खड्डेमय बनला होता. याबाबत अनेकानी या रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतुकीस योग्य करावा, अशी मागणी वेळोवेळी केली होती. याची दखल घेऊन रस्ते प्राधिकरणाने हा रस्ता तात्पुरता सुरू केला. मात्र उडणाऱया धुळीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून, व्यापारी हतबल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबल्याने गोवा क्रॉस ते जांबोटी क्रॉस या रस्त्यावरून वाहतूक करणे जोखमीचे बनले आहे. प्राधिकरणाने वाळूमिश्रित खडी पसरवून रस्ता वाहतुकीस योग्य केला असला तरी यावरुन वाहने जाताना मोठय़ा प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी जाताना धुरळा उडत असल्याने मागील वाहन चालकाना एकदम समोरील दिसणे बंद होत आहे. बस तसेच ट्रक व इतर अवजड वाहने भरधाव जात असल्यामुळे उडणाऱया धुळीच्या लोळांमुळे दुचाकीस्वारांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वाहनधारकांना या धुळीमुळे डोळय़ाना त्रास होत आहे. यासाठी तातडीने हा रस्ता होणे गरजेचे आहे. हेस्कॉम, मासळी मार्केट ते गोवा क्रॉस या रस्त्यावरील संपूर्ण खडी पूर्णपणे वर आली आहे. यापूर्वी हा रस्ता वन टाईम डेव्हलपमेंट प्रोग्रॉममधून मंजूर झाल्याचे प्राधिकरणाने सांगितले होते.
रस्ता कामांकडे अद्यापही दुर्लक्ष
ऑक्टोबरनंतर या रस्त्याचे पुन्हा काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या रस्त्याकडे रस्ते प्राधिकरणाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. शहरांतर्गत जात असलेला रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविणे कठीण बनले आहे. तसेच उडणाऱया धुरळय़ामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे कसरत बनली आहे. मात्र या बाबीकडे कोणत्याच नेत्यांचे लक्ष नसल्याने नागरिकांतून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.