परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू
प्रतिनिधी /मोरजी
बदलत्या वातावरणाचा परिणाम सागरी कासवांवर झाला आहे. एरवी नोव्हेंबर महिन्यात कासवांचे आगमन होत होते. यंदा प्रथमच सागरी कासव एक जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता आश्वे येथील परिसरात प्रगट झाले. त्यांनी अंडी घातलेला परिसर सुरक्षित करण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱयांचे प्रयत्न सुरू आहेत.
सागरी कासवांनी आश्वे येथील शांत परिसर असलेल्या जमिनीच्या शेजारी किनारी भागात एका कासवाने अंडी घातल्याची माहिती तेथील सुरक्षा रक्षकाने वन विभागाला दिली. त्यानंतर त्या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी गाड यांनी येऊन त्या परिसरात जाळी मारून सुरक्षा देण्यावर भर दिलेला आहे.
कासव संवर्धन मोहीम 1997 सालापासून टेम्बवाडा मोरजी परिसरात राबवली जात आहे. त्यामुळे हजारो सागरी कासवांच्या पिल्लाना समुद्रात सोडण्यासाठी वन खाते आणि वन विभागाला यश आले आहे. टेम्ब वाडा येथे पाचशे चौरस मीटर जमीन ही सागरी कासवांच्या अंडय़ांच्या सुरक्षतेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आरक्षित केली आणि त्याच ठिकाणी हंगामी स्वरूपाची अभ्यास केंद्र म्हणून वन विभागाने तंबू उभारलेला आहे.
मोरजी आणि मांदे हा संवेदनशील किनारा म्हणून जाहीर केला होता. परंतु 2022 अखेरीस हा किनारा कमर्शियल झोन म्हणून जाहीर केला आहे. तशा प्रकारचे परिपत्रक सरकारी गॅझेट मध्ये प्रसिद्ध झालेले आहे.
आश्वे मांद्रे येथे सागरी कासवानी अंडी घातलेल्या परिसरात कसल्याच प्रकारचे कमर्शियल बांधकामे काँक्रिटीकरण झालेले नाही. पर्यावरण प्रेमी डेंझील सिक्वेरा यांनी त्या ठिकाणचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याच किनारी भागात रविवारी 1 रोजी सागरी कासवाने सायंकाळी 7 वाजता अंडी घातली.
वनमंत्र्यांनी बेकायदा बांधकमांची पहाणी करावी
वनमंत्री विश्वजीत राणे यांनी नुकतेच सागरी कासवाने अंडी घातलेला भाग सुरक्षित ठेवण्याबरोबरच या परिसरात बांधकामांवर निर्बंध घातले जातील. तशा प्रकारचे प्रयत्न आपण केंद्र सरकारकडे करणार असल्याचे जाहीर केले आहे. एकंदरीत आश्वे आणि मांदे परिसरात सीआरझेडचा भंग करत एकापेक्षा अनेक काँक्रिटीकरणाची बांधकामे उभी आहेत. या भागात वनमंत्री विश्वजित राणे यांनी भेट देऊन ही बांधकामे पहावीत व नंतरच बेकायदा बांधकामांवर निर्बंध घातले जाईल असे नंतर जाहीर करावे असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.