ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत भाजपासोबत मिळून सत्ता स्थापन केली. आता मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. मात्र, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिंदे गटातील अनेकजण नाराज आहेत. यामध्ये औरंगाबाद पश्चिम महाराष्ट्राचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचाही समावेश आहे. अशातच शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्विट केला, ज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असा उल्लेख केला होता. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात शिरसाट पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. परंतु संजय शिरसाट यांनी स्वत: माध्यमासमोर येत आपल्या नाराजी नाट्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद पश्चिम महाराष्ट्राचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच शिरसाटांनी उद्धव ठाकरेंचा कुटुंबप्रमुख म्हणून उल्लेख करत ट्वीट केलं आहे. यासोबत त्यांनी ठाकरेंचा विधानसभेतील भाषणाचा व्हिडिओही जोडला आहे. मात्र, काही वेळांनी त्यांनी हे ट्वीट डिलीट केलं. त्यामुळे शिरसाट आता पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतणार की काय? अशा प्रकारच्या चर्चा सुरु आहेत. परंतु शिरसाटांनी ते ट्विट टेक्निकल प्रोब्लेममुळे झाल्याचं म्हंटलं आहे.
शिरसाट म्हणाले, पहिल्यापासून सांगत आलो की, शिवसेना पक्षप्रमुख मातोश्रीचे कुटुंब असेल त्यांच्याबद्दल आम्ही आदर भाव ठेवून आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही उद्या काहीतरी गडबड करणार आहोत. मंत्रिपदाचा काळ होत त्यात अनेक घटना घडत असतात. आम्हालाही नंदनवनला बोलवण्यात आलं होतं. आम्ही चर्चा सुद्धा केल्या, पण मंत्रिमंडळ विस्तारात नावं कमी जास्त होत असताना राग येणं, संताप येणं आणि एकमेकांचे विचार मांडणे या गोष्टी होतात. असं शिरसाट यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय घेतला. चर्चा करून मंत्रिमंडळाची अंतिम यादी फायनल झाली. म्हणून या गोष्टीला उठावाशी संबंध नाही असे शिरसाट म्हणाले.
राजकारणात पुढं जावं वाटणं असं मला वाट नाही का? संधी मिळावी असं वाटत नाही का? असं वाटणं साहाजिक आहे, आणि त्याची नाराजी चेहऱ्यावर दिसणं देखील स्वाभाविक आहे, त्याला कोणी अडवू शकत नाही, मी नाराज होतो, त्यावेळी त्यांनी मला समजवलं, त्यांनी पुढच्या वेळी पाहू, विषय तिथे संपला, असही शिरसाट म्हणाले.
मी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे. पालकमंत्रीपद द्यावे अशी मागणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली, मात्र याबाबत अंतिम निर्णय हा एकनाथ शिंदे घेतील, पुढच्या मंत्रीमंडळ विस्तार मला संधी मिळणार असल्याचा शब्द दिला असल्याचेही ते म्हणाले.