19 ऑक्टोबरला मतमोजणी ः कार्यकारिणीच्या बैठकीअंती निवडणूक कार्यक्रम जाहीर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसात एकामागून एक नेत्यांनी पक्षत्यागाला सुरुवात केल्यानंतर काँग्रेस हायकमांडने अखेर रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा केली. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार, याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर रविवारी दुपारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत याची तारीख निश्चित केली आहे. बैठकीत ठरविलेल्या निर्णयानुसार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी 22 सप्टेंबरला अधिसूचना जारी होणार आहे. त्यानंतर 17 ऑक्टोबरला मतदान आणि 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीत रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. सध्या विदेशात असलेल्या पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाल्या होत्या. तसेच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याव्यतिरिक्त हरिष रावत, सलमान खुर्शिद, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, कुमारी सेलजा, मधुसूदन मिस्त्री, के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश, अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह अनेक नेते या बैठकीत काँग्रेस कार्यालयात उपस्थित होते. सध्या पक्षावर नाराज असलेले आनंद शर्माही बैठकीला हजर राहिले होते. त्यांनी शनिवारी संध्याकाळी काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली होती.
…अशी असेल निवडणूक प्रक्रिया
निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी केली जाईल, तर उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होईल. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याचे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी बैठकीनंतर जाहीर केले. उमेदवारी अर्ज छाननीची तारीख 1 ऑक्टोबर असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर असेल. जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर, 17 ऑक्टोबर रोजी मतदान होईल आणि मतमोजणी-निकालाची घोषणा 19 ऑक्टोबर रोजी होईल, असेही मिस्त्री पुढे म्हणाले.
पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा एकदा अध्यक्ष होण्यासाठी विचारणा केली. मात्र, राहुल गांधी यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक नेत्यांकडून जाहीरपणे राहुल यांना पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याचे आवाहन केले जात आहे, तर राहुल गांधी हे पक्षाध्यक्ष न होण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे समजते. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सलग दुसऱयांदा नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागल्यावर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच नव्या अध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया टाळली होती. पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान होणार असल्याची घोषणा काँग्रेसने मागील वर्षी केली होती. काँग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीला काही आठवडय़ांचा विलंब होण्याची शक्यता आहे, कारण पक्षाने सध्या कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आयोजित केल्या जाणाऱया ‘भारत जोडो यात्रे’वर लक्ष केंद्रीत केले आहे.
7 सप्टेंबरपासून ‘भारत जोडो’ यात्रा
काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करणार आहे. 148 दिवसांच्या या यात्रेची सांगता काश्मीरमध्ये होणार आहे. हा पाच महिन्यांचा प्रवास 3,500 किमी आणि 12 राज्यांपेक्षा जास्त अंतर कापून संपणार आहे. या पदयात्रेत दररोज 25 किमी अंतर पार केले जाईल. या पदयात्रेत रॅली आणि जाहीर सभांचा समावेश असेल, ज्यात सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरि÷ नेतेही उपस्थित राहणार आहेत.
………..
आता निवडणूक घेणे हाच पर्याय!
पक्ष वाचवण्यासाठी आता पावले उचलावी लागतील. ‘कठपुतळी अध्यक्ष’ बनवून ‘बॅकसीट ड्रायव्हिंग’ (मागून गाडी चालवण्याचा) प्रयत्न केला तर काँग्रेस टिकू शकणार नाही. गांधी कुटुंबीयांपैकी कोणीही अध्यक्ष होण्यास राजी नसल्यास दुसरी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. साहजिकच निवडणुकाअंती कोणीतरी अध्यक्ष होईल.
– पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते.