एकाच खांबाला चक्क तीन दिवे, अंत्यसंस्कार करतानाही यातनाच : स्वच्छता करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
जन्म आणि मृत्यू हा माणसाचा ठरलेलाच आहे. जन्मल्यानंतर प्रत्येकाला आनंद होतो, तर मृत्यू झाल्यानंतर सारे दुःखात असतात. त्या दुःखातच स्मशानभूमीमध्ये जाऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करून शेवटचा निरोप दिला जातो. मात्र अनगोळच्या स्मशानभूमीमध्ये शेवटचा निरोप देताना अंधारातच अंत्यसंस्कार करावा लागत आहे. यामुळे अंत्यविधीसाठी आलेले नागरिक व नातेवाईकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
विकास केल्याच्या वल्गना वारंवार केल्या जातात. स्मार्ट सिटीचा बेळगावमध्ये समावेश झाला आहे. मात्र या परिसरातील स्मशानभूमीची अवस्था अजूनही जैसे थे आहे. त्यामुळे निश्चितच विकास झाला आहे काय? हे आता तपासून पहावे लागणार आहे. गेल्या महिन्यात पंढरपूर येथे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी व्यक्तीचा अंत्यसंस्कार मोबाईलच्या प्रकाशझोतात केला.
याबाबत प्रसारमाध्यमांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर काही जागरूक सामाजिक कार्यकर्त्यांनी दुरुस्ती करून घेतली. मात्र त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी अंधार पसरत आहे. स्मशानभूमीजवळ पाच ते सहा खांब आहेत. मात्र एकाच खांबावर तीन दिवे लावण्यात आले आहेत. त्याचा इतर ठिकाणी प्रकाश पडणे कठीण झाले आहे.
स्मशानभूमीमध्ये मृतदेहाला अग्नि देण्यासाठी उजव्या बाजूला चार शेगडय़ा बसविण्यात आल्या आहेत तर डाव्या बाजूला दोन शेगडय़ा आहेत. त्यावर शेड बांधण्यात आले आहे. त्यामुळे त्याठिकाणी प्रकाश जाणे कठीण आहे. या स्मशानभूमीमध्ये अनेक खांब आहेत. त्यावर दिवे आहेत, मात्र ते बंद पडले आहेत. तेव्हा या सर्व गैरसोयींकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच दिवे लावून सर्वत्र स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.