कास / अंकुश कोकरे
देशात सर्वत्र अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना परळी खोऱ्याच्या डोंगरमाथ्यावरील गणेशवाडी, दत्तवाडी वस्त्यांतील नागरीकांना दळवळणाच्या सुविधे अभावी रुग्णांसाठी पारंपारिक ‘ढालग्याची अम्बयलंस’ करुन वैद्यकिय उपचारासाठी इतरत्र न्यावे लागत असून स्वातंत्र्याचा ७५ वर्षाचा कालावधी उलटुनही प्राथमिक वैद्यकिय सुविधा मिळत नसल्याने नागरीकांना उपेक्षित जिवन जगावे लागत आहे. या वाडी वस्त्यांवर पक्का रस्ता नसल्याने लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी वेळीच लक्ष घालुन रस्ता बनवुन द्यावा अशी मागणी होत आहे.
परळी खोऱ्याच्या डोंगरमाथ्यावरील केळवली ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गणेशवाडी, दत्तवाडी गावाला दळणवळणाच्या मुख्यप्रवाहात येण्यासाठी अद्याप पक्का रस्ता नसल्याने कित्येक मैल पायपीट करावी लागते. शनिवारी सायंकाळी गणेशवाडी गावातिल एका ७० वर्षीय वयोवृद महीलेची अचानक प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला दवाखान्यात नेण्यासाठी मुसळधार पावसात दोन लाकडानां ढालगे बांधुन त्यात आजीला बसवुन चौघांनी खंद्या वरून तिन ते चार किलोमीटरच्या चिखल घसरणीच्या पायवाटेवरून वारसवाडी येथील दूध वाहतुक करणाऱ्या टेम्पो पर्यंत उचलुन न्यावे लागले. सातारा येथील दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पुन्हा त्यांच्या परतीच्या प्रवासालाही ‘ढालग्याचीच अॅम्ब्युलन्स’ करावी लागणार आहे. मात्र हा प्रकार वयोवृद्ध गरोदर महीला गंभीर आजारी यांच्यासाठी नित्याचाच बनला आहे. “आमच्या वाड्यांवर कधी पक्का रस्ता येणार, आम्ही विकासाच्या मुख्यप्रवाहात, कधी जोडलो जाणार, माणसं चंद्रावर पोहचली मात्र या गावात अजुन रस्ता पोहचला नाही हे आमचे दुर्दैव की भोग असा प्रश्न स्थानिकांतुन उपस्थीत होत आहे.
निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या गणेशवाडी, दत्तवाडी, गावांशेजारी जंगल असल्याने वन्य प्राण्यांचाही सुळसुळाट आहे. त्यामुळे शेती पिकविणे रात्री अपरात्री घराबाहेर पडणे मुश्कील झाले असुन रस्ता नसल्याने रात्रीच्या वेळी एखाद्याची प्रकृती खालावल्यास उपचाराअभावी जिव गमवावा लागतो. गणेशवाडीला जोडण्यासाठी वारसवाडी येथुन तिन ते चार किलोमिटरचा पक्का रस्ता होणे अपेक्षीत आहे. हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दत्तवाडीला केळवली येथून तिन ते चार किलोमीटर पक्का रस्ता होणे गरजेचे आहे. या दोन्ही वाड्यांमध्ये उन्हाळ्यात मातीच्या मार्गावरून प्रामुख्याने वारसवाडी व केळवली येथुन वेळ प्रसंगी दुध वाहतुकीचे टेम्पो आदळआपट खात पोहचत असतात याच मार्गावरून पक्का रस्ता होण अपेक्षीत आहे.