गौंडवाड ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : कुटुंबीयांचा आक्रोश, पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे मुलाचा बळी गेल्याचा आरोप
प्रतिनिधी /बेळगाव
देवस्थानच्या जमिनीतून गौंडवाड येथे गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. या वादातूनच एका तरुणाचा बळी गेला असल्यामुळे गौंडवाड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतीश पाटील याचा बळी गेल्यानंतर संपूर्ण गाव एकवटले असून आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदनाद्वारे केली आहे.
सतीश राजेंद्र पाटील याचा शनिवार दि. 18 रोजी रात्री खून करण्यात आला. या घटनेनंतर गावात दहशत निर्माण झाली. जाळपोळ झाली. सतीश याचा हकनाक बळी गेला. आपल्या मुलाने अशी काय चूक केली? त्याचा खून करण्यात आला, असा आक्रोष सतीशची आई, पत्नी आणि बहीण करत होती. कोरोनाकाळात माझ्या मुलाने अनेकांना औषधे दिली. अनेकांना उपचार करण्यास मदत केली. सामाजिक कार्यात नेहमीच पुढे राहत होता. मात्र ते बघवले नाही आणि त्याचा खून करण्यात आला. खून करणाऱयांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली आहे.
गौंडवाड येथील निलजकर, कुट्रे, पाटील कुटुंबीयांनी हा खून केला आहे. तेव्हा त्या कुटुंबातील आरोपींना फाशी द्यावी, पोलिसांनी आम्हाला आजपर्यंत सहकार्य केले नाही. आरोपींनाच त्यांनी पाठीशी घातले आहे, असा आरोपदेखील यावेळी करण्यात आला. आतादेखील गावात राहणे आम्हाला अशक्मय झाले आहे. रात्रीच्यावेळी आरोपी धमकी देत आहेत. पोलीस त्यांनाच पाठीशी घालत आहेत. त्यामुळे आम्ही भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचे गौंडवाड येथील महिलांनी यावेळी सांगितले.
या खूनप्रकरणामध्ये अनेकांचा हात आहे. तेव्हा त्या सर्वांना अटक करावी. सध्या सुरू असलेली दहशत थांबवावी, अशी मागणीही यावेळी केली आहे. आम्हाला न्याय द्या, अशी आर्त हाक महिला देत होत्या. पोलिसांनी जर वेळीच सहकार्य केले असते, तसेच प्रकरण हाताळले असते तर ही घटनाच घडली नसती, असा आरोपही नागरिकांनी केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून महिलांनी आक्रोष केला. गेल्या अनेक वर्षांपासून हाणामारी तसेच दहशतीचे वातावरण पसरले आहे. असे असताना पोलिसांनी मात्र आजपर्यंत काहीच केले नाही. उलट गावातील जनतेलाच ते धमकी देत आहेत. सतीशलाही पोलिसांनीच धमकी दिली होती, असा आरोपदेखील यावेळी केला आहे. या प्रकरणात पोलिसांचाही समावेश असून त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी गौंडवाड येथील महिला व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
परवानगी मागण्यास गेलेल्या महिलांनाच दमदाटी
बुधवारी मोर्चा काढण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्यासाठी महिलांनी काकती पोलीस स्थानकात जाऊन मोर्चा काढण्याची परवानगी मागितली. यावेळी पोलिसांनी त्यांनाच दमदाटी केली, असा आरोपदेखील महिलांनी केला आहे. एकूणच पोलिसांची ही भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही करण्यात आला.