केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे दक्षिणेतील राज्यांना आवाहन
थिरुवनंतपुरम / वृत्तसंस्था
दक्षिणेतील राज्यांनी सामोपचाराने नद्यांच्या पाणीवाटपातील मतभेदांवर संयुक्त तोडगा काढावा, असे आवानह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. केरळची राजधानी थिरुवनंतपुरम येथे आयोजित 30 व्या दक्षिण क्षेत्रीय परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते उपस्थितांसमोर भाषण करीत होते.
नद्यांच्या पाणीवाटपासह एकंदर 26 मुद्दय़ांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली. तसेच यांपैकी 9 मुद्दय़ांवर समाधानकारक तोडगाही काढण्यात आला. या बैठकीत आंध्र प्रदेश. तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांचे मुख्यमंत्री तसेच पाँडिचेरीचे उपराज्यपाल समाविष्ट झाले होते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही दोन राज्ये पूर्वीच्या एकत्रित आंध्र प्रदेशचे विभाजन करुन निर्माण करण्यात आली आहेत. या विभाजनाला आठ वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी या दोन राज्यांमधील संबंधांमध्ये आजही समस्या आहेत. त्या त्यांनी आपसात चर्चा करुन मिटवाव्यात. केंद्र सरकार त्यांना याकामी सहकार्य करण्यात तयार आहे. लवकरच लवकर तोडगा काढल्यास दोन्ही राज्यांचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे प्रतिष्ठेचा मुद्दा न बनविता तोडगा काढावा, अशीही सूचना शहा यांनी केली.
पाण्यावरुन अनेक संघर्ष
दक्षिणेतील जवळपास प्रत्येक आंतरराज्य नदीच्या पाणी वाटपासंबंधी समस्या निर्माण झाल्या आहेत. कावेरी नदीच्या पाणीवाटपासाठी चाललेला कर्नाटक विरुद्ध तामिळनाडू हा संघर्ष तर ब्रिटीश राजवटीपासून आजवर होत आहे. तोडग्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने लवादाची स्थापना केली आहे. मात्र, उन्हाळय़ाच्या दिवसांमध्ये हा संघर्ष पुन्हा पुन्हा उफाळून येतो. सर्वोच्च न्यायालयाच्या लवादाला मध्यस्थी करावी लागते. या प्रश्नावर कावेरी खोऱयात कित्येकदा हिंसाचारही झाला आहे.
इतर राज्यांमध्येही असेच
कर्नाटक आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात कावेरी नदीच्या पाणीवाटपावरुन मतभेद आहेत. तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्यातही कावेरी पाणीवाटपाच्या प्रश्नावरुन संघर्ष आहे. हे सर्व संघर्ष 80 ते 90 वर्षे जुने असून संबंधित राज्यांनी त्यांचा प्रतिष्ठेचा प्रश्न बनविला आहे. तसेच या नद्यांच्या खोऱयातील राजकारणही याच मुद्दय़ावर अवलंबून असल्याने तोडगा काढण्यास अडथळा निर्माण होत आहे, असे अनेक राजकीय तज्ञांचे विश्लेषण असल्याचे दिसून येते.
जलदगती रेल्वे कॉरीडॉर
या बैठकीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन करुणानिधी यांनी दक्षिणेतील राज्यांना जोडणारा जलदगती रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्यात यावा, अशी मागणी केली. तामिळनाडूतील कोईंबतूर, तुतीकोरीन आणि मदुराई ही तीन शहरे तसेच इतर दाक्षिणात्य राज्यांमधील महत्वाची शहरे यांना जोडणारा जलदगती रेल्वे मार्ग निर्माण करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. वायूमार्ग किंवा महामार्ग यांच्यापेक्षा रेल्वे प्रवास आणि वाहतूक अधिक स्वस्त व वेगवान असते, हे त्यांनी अमित शहा यांच्या निदर्शनास आणून दिले, अशी माहिती देण्यात आली.
पुदुच्चेरीच्या उपराज्यपालांची मागणी
पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल तमिळीसाई सुंदरराजन यांनी या केंद्रशासित प्रदेशाच्या विकासासाठी केंद्र सरकारने 2,200 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली. आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ, महामार्ग आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ही रक्कम आवश्यक आहे. पुदुच्चेरी हे जागतिक पर्यटनस्थळ असल्याने तेथील विमानतळाचा विस्तार होणे आवश्यक आहे. तसेच या विमानतळाच्या विकासासाठी तामिळनाडू राज्याने पुदुच्चेरीला काही जमीन द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. अमित शहा यांनी सर्व बाजूंचा विचार करुन योग्यवेळी निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे.