मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये होते कायदा मंत्री
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री शांति भूषण यांचे मंगळवारी निधन झाले आहे. शांति भूषण यांनी मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता दिल्लीतील स्वतःच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही काळापासून ते आजारी होते. निधनासमयी ते 97 वर्षांचे होते. मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये 1977-79 पर्यंत केंद्रीय कायदामंत्री म्हणून त्यांनी काम केले होते.
अलाहाबाद उच्च न्यायालयात गाजलेल्या खटल्यात त्यांनी राजनारायण यांचे प्रतिनिधित्व केले होते. या खटल्याच्या पार्श्वभूमीवरच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती. शांति भूषण यांनी जनहिताचे अनेक मुद्दे उपस्थित करत जनतेची सेवा केली होती. तसेच भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढय़ात त्यांचा मोठा सहभाग होता. शांति भूषण यांना घटनातज्ञ मानले जायचे. कायदेशीर मुद्दय़ांवर त्यांचे मोठे प्रभुत्व होते.
1980 मध्ये शांति भूषण यांनी ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली होती. या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वपूर्ण जनहित याचिका दाखल केल्या होत्या. 2018 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत ‘मास्टर ऑफ रोस्टर’ सिस्टीममध्ये बदल करण्याची मागणी केली होती. प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण हे शांति भूषण यांचे पुत्र आहेत.