प्रतिनिधी / खानापूर : शहरात गणपती उत्सवाच्या खरेदीला लोकांनी तुफान गर्दी केली आहे. राजा छत्रपती स्मारक ते पारिषवाड क्रॉस पर्यंत लोकांची गणेशोत्सव सामान खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत आहे.
गणेशाच्या सजावटीला लागणारे सामान, फळफळावळ दुकाने तसेच भाजीपाला, माटोळ्यायासह फटाके, कापड दुकान किराणा दुकान स्टेशनरी दुकानात सामानांच्या खरेदीसाठी लोकांनी एकच गर्दी केलेली आहे. बुधवारी गणेश चतुर्थी असल्याने आज सकाळी नऊ वाजल्यापासूनच खरेदीला सुरुवात झालेली आहे. खरेदीसाठी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत गर्दी राहणार आहे. पोलिसांनी राजा छत्रपती स्मारकापासून दुचाकी व चार चाकी जाण्यास मनाई केली आहे. याबद्दल अनेकांनी तक्रारी व नाराजी व्यक्त केली आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते नेताजी देसाई यांनी सांगितले की आज गर्दी असली तरी रोजच छत्रपती स्मारक ते ज्ञानेश्वर मंदिर पर्यंत प्रचंड गर्दी असते याबाबत नगरपंचात आणि पोलीस प्रशासन याबाबत जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शहरात रस्ता रुंदीकरण होणे आवश्यक आहे. याबाबत मास्टर प्लॅन करण्यात यावा अशी मागणी वेळोवेळी होत आहे. मात्र नगरपंचायतीच्या नगरसेवकाकडून व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने अनेक वेळेला ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे. यासाठी पुढील भविष्याचा विचार करून शहरात मास्टर प्लॅन होणे आवश्यक आहे. असे नेताजी देसाई यावेळी म्हणाले.