वेळेत उचल नसल्याने प्रवाशांना करावा लागतोय दुर्गंधीशी सामना
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात कचऱयाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. स्मार्ट बसस्थानकासमोर कचऱयाची वेळेत उचल केली जात नसल्याने कचऱयाचा ढीग साचला आहे. त्यामुळे ये-जा करणाऱया प्रवाशांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. वेळेत कचऱयाची उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.
बसस्थानकाच्या आवारात हॉटेल, फेरीवाले व इतर व्यावसायिक असल्याने कचऱयाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या सौंदर्याला बाधा पोचत आहे. कचरा साचून राहिल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
बसस्थानक आवारात कचऱयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा साचून राहत असल्याने भटकी जनावरे, कुत्री व डुकरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात ये-जा करणे कठीण झाले आहे. बसफेऱया वाढल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र प्रवाशांना सुविधांपेक्षा असुविधांशी सामना करावा लागत आहे. बसस्थानकात पसरलेल्या अस्वच्छतेबाबत गांभीर्याने लक्ष देवून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.