3 बी मधून 2 ए मध्ये समावेश करण्याचा मंत्री आर. व्ही. देशपांडे यांचा आग्रह
प्रतिनिधी /बेळगाव
3 बी मधून 2 ए मध्ये समावेश करावा, यासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने आरक्षण जाहीर करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी बुधवारी विधानसभेत केली.
शून्य तासात आर. व्ही. देशपांडे व श्रीनिवास माने यांनी मराठा आरक्षणाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. मंगळवारी बेळगाव येथे मराठा समाजाने निदर्शने केली आहेत. हा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. एमएलआयआरसीच्या माध्यमातून देश संरक्षणात नेहमी या समाजाचा पुढाकार आहे. त्यांचा त्याग व बलिदान महत्त्वाचे आहे, असेही आर. व्ही. देशपांडे यांनी सांगितले.
आरक्षण नसल्यामुळे मराठा तरुणांना शिक्षण, उद्योगात संधी मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. गोसावी मठाचे श्री मंजुनाथ भारती स्वामीजींच्या उपस्थितीत आंदोलन झाले आहे. स्वामीजींनी मुख्यमंत्र्यांनाही आरक्षणासाठी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून मंत्री सुनीलकुमार यांनी निवेदन स्वीकारले आहे. खरे तर 2012 मध्ये शंकराप्पा यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने शिफारसही केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्या, अशी मागणी आर. व्ही. देशपांडे यांनी केली.
कायदा व संसदीय मंत्री माधुस्वामी यांनी मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल मागवून निर्णय घेऊ, असे उत्तर दिले. याचवेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनीही सरकारची भूमिका मांडली. शंकराप्पा आयोगाने शिफारस केली आहे, ही गोष्ट खरी आहे. मात्र, त्यावेळी घटनात्मक मागासवर्गीय आयोग नव्हता. आता या शिफारशी आयोगाकडे पाठवून योग्य निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.