मुंबई : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर उर्वरित शिवसेना आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत देखील एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचं काही आमदारांनी सांगितले आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह अनेकांनी आपली ‘मन की बात’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळ बोलून दाखवली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये खळबळ माजली आहे. तर इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेमध्ये सर्वात मोठे बंड एकनाथ शिंदे यांनी ३५ आमदारांना घेऊन केले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शिवसेनेत अंतर्गत भूकंप होऊन त्याचा विस्फोट झाल्याची चर्चा आज संपूर्ण राज्यात आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर उर्वरित आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत ५५ पैकी १८ आमदार उपस्थित होते. यातील काही आमदारांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर सहमत असल्याचे मत नोंदवला आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, आपण भाजपसोबत जाऊया अशी ‘मन की बात’ आमदारांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी सोबत केलेली युती शिवसेनेच्या काही आमदारांना रुचलेली नाही हेच सिद्ध होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.