ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. कोश्यारी यांच्यावर राज्यभरातून टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षतेने अजित पवार (Ajit Pawar) यांनीही ट्विट करत कोश्यारी यांच्यावरील संताप व्यक्त केला आहे.
अजित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील”
“महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही माननीय राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर माननीय राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.
राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची मा. पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. मा. राज्यपाल महोदयांना सद्बुद्धी लाभो, ही प्रार्थना!”