सरकारचे सहा महिन्यात खाणी सुरू करण्याचे आश्वासन फोल : सरकारसह, खाण अवलंबितही विसरले खाणीचा प्रश्न,…प्रश्न राहिला खाण कामगारापुरता
प्रतिनिधी /फोंडा
राज्यातील डॉ. .प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने सहा महिन्यात खाणी सुरू करण्याचे आश्वासन हवेत विरलेले आहे. सहा महिन्यानंतर सरकारबरोबर खाण अवलंबितानाही खाणी सुरू करण्याचा ज्वलंत विषयांचा विसर पडलेला आहे. खाणीचा प्रश्न फक्त खाण कंपनीतील कामगारापुरता मर्यादीत राहिलेला असून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली एकाकी झुंज सुरू राहील असे मत कामगार नेते पुती गावकर यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केले आहे.
राज्य सरकार व केंद्र सरकारने निवडणूकीत मते मिळवलण्यापुरते भोळय़ा जनतेला खाणी सुरू कण्याचे गाजर प्रत्येकवेळी दाखविलेले आहे. जनताही भाजपाच्या पोकळ आश्वासनांना बळी पडलेली आहे. खाण अवलंबितांनी विधानसभा निवडणूकीत सरकारला अद्दल घडविण्याच्या सुवर्णसंधी गमावलेली आहे. खाण अवलंबितांनी आपल्या कुटूंबियांना सरकारी नोकरीत सामावून घेण्याचो आशेवर भाजपा सरकारच्या बाजूने कौल दिल्यामुळे डॉ. प्रमोद सावंत सरकारचे आयतेच फावलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2019 रोजी शामाप्रसाद मुखर्जी येथे झालेल्या सभेत थोडयाच दिवसात राज्यातील खाण उद्योग सुरू करण्याचे आश्चासन दिले होते. त्याचाही मान राज्य सरकारने ठेवलेला नसून राज्य सरकारतर्फेही सद्या खाणी सुरू करण्याबाबत कोणत्याच हालचाली दिसून येत नाही. उलटपक्षी सुर्ला येथील वेदांता खाण कंपनीने सुमारे 115 कामगारांना कामावरून कमी करण्याची नोटीस बजावलेली आहे. त्यामुळे खाण प्रश्न आता खाण कामगारांपुरता मर्यादीत राहिल्याची खंत पुती गावकर यांनी व्यक्त केली आहे. सदरप्रकरणी जोपर्यंत जनआदोंलन होत नाही तोपर्यत सरकारला जाग येणार नाही. खाणी सुरू करण्याचा ज्चलंत विषय तापवून निवडणूकीपुरती पोळी भाजण्याचा भाजपा सरकारचा डाव असल्याचा घणाघाती आरोप पुती गावकर यांनी केला आहे.