सरासरी 89% ते 94% मतदारांनी बजावला हक्क
विश्वनाथ मोरे / कसबा बीड
करवीर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक सुरू झाली. यामध्ये कसबा बीड, सावरवाडी, हिरवडे दुमाला , सडोली दुमाला, मांडरे, आरळे या गावांमध्ये अत्यंत चुरशीने व शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. सरासरी 89% ते 94% मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
यामध्ये प्रामुख्याने कसबा बीडमध्ये गतवेळेस काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. सध्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस शिवसेना व अपक्ष अशी निवडणूक झाली असून यामध्ये 88.38% मतदान झाले. काँग्रेस पक्षाचे शामराव सूर्यवंशी व शिवसेना पक्षाचे उत्तमराव वरुटे यांच्यात काट्याची लढत झाली आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवारांनी सुद्धा गावाच्या विकासाचे मुद्दे उपस्थित करून आपली बाजू मांडली.
सावरवाडी येथे गतवेळच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत होऊन थेट निवडीद्वारे सरपंच शिवसेनेचा झाला होता. सद्यस्थितीला काँग्रेस गटामध्ये विभागणी होऊन काँग्रेस विरुद्ध काँग्रेस- शिवसेना अशी लढत झाली. यामध्ये 89 % मतदान झाले.
हिरवडे दुमाला येथील स्थानिक गटाच्या राजकारणामुळे 92 टक्के मतदान झाले आहे तर जवळच सडोली दुमाला येथे अत्यंत चुरशीने 94% मतदान झाले आहे.
सावर्डे दुमाला येथे काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी गतवर्षीची निवडणूक होती. यामध्ये शिवसेनेचे सरपंच झाले होते. यावर्षी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट निर्माण होऊन शिवसेना -काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होऊन येथे 92% मतदान झाले.
मांडरे या गावांमध्ये काँग्रेस गट विरुद्ध काँग्रेस गट यामध्ये थेट लढत होऊन 92% मतदान झाले. तर आरळे येथे काँग्रेस शिवसेना व मित्र पक्ष अशी आघाडीची सत्ता होती. यावेळी काँग्रेस गट, वंचित आघाडी व मित्रपक्ष विरुद्ध काँग्रेस भाजप मित्रपक्ष यामध्ये लढत झाली आहे. येथे 89% मतदान झाले.
एकंदरीत कसबा बीड परिसरात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना तर काही ठिकाणी काँग्रेस मित्रपक्ष शिवसेना विरुद्ध काँग्रेस, काँग्रेस शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी थेट गटातटात झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या मतदानामध्ये कोण बाजी मारणार ? यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.