प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 125 मेगावॅट वीज खुल्या बाजारातून खरेदी करण्यासाठी हिरवा कंदील दर्शवला असून येत्या दोन चार दिवसात ती खरेदी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे उद्योगांचा विजेचा प्रश्न सुटणार असल्याची आशा त्यांनी वर्तवली आहे.
उन्हाळय़ाचे दिवस असल्याने गोव्यात विजेची मागणी वाढल्याने मिळणारी वीज अपुरी पडते आणि त्याचा फटका उद्योगांना बसतो म्हणून खुल्या बाजारातून वीज घेण्याचे संकेत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले होते तसेच या संदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याची माहिती दिली होती. त्या प्रस्तावास डॉ. सावंत यांनी मान्यता दिली आहे. येत्या 30 एप्रिलपूर्वी जर वीज खरेदी केली नाही तर त्याचा विविध उद्योगांना मोठा फटका बसणार असल्याची भीती ढवळीकर यांनी प्रकट केली होती. आपले सरकार सर्व प्रकारच्या विकासासाठी व साधनसुविधांसाठी तत्पर असून उद्योग, जनतेला झळ बसणार नाही, याची दक्षता घेत आहे. जनतेच्या कल्याणासाठी सरकार तत्पर असल्याचे निवेदनही डॉ. सावंत यांनी केले आहे.