निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता : बदलीसत्राने अनेक अधिकाऱ्यांची मलई जाण्याची भीती : मार्चअखेर जवळ आल्याने कामे आटोपण्यावर भर
बेळगाव : निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत, तसे अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र चालू झाले आहे. मात्र, मार्च जवळ आल्याने अधिकारी कामे आटोपण्याच्या तयारीत असून मलई लाटण्यावर भर देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अनेकांना हुरहूर लागली आहे. दरम्यान, बदलीचे सत्र सुरू झाल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना आपली मलई दुसरेच खाणार, अशीच भीती लागून राहिल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे बदली झाली असली तरी ती पुढे ढकलण्यातच धन्यता मानली जात असल्याचे दिसून येत आहे. तालुका व जिल्हा पंचायतमध्ये आतापासूनच कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकारीवर्ग करू लागला आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करून त्यांची बिले ताबडतोब अदा करा, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मार्च अखेरची ही घाई सुरू आहे. अधिकाऱ्यांनी कामे आटोपण्यावर भर दिला असून टक्केवारीबाबतही चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.
‘त्यांनी’ पैसा कमाविण्याची हीच वेळ
ता.पं.मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप आताही होत आहेत. मात्र, सर्वाधिक पैसा कमाविण्याची हीच वेळ असल्यामुळे अधिकारी आतापासून कामाला लागल्याचे चित्र आहे. काही समविचारी कंत्राटदार व अभियंत्यांना हाताशी धरून मार्चअखेरची तयारी पूर्ण करण्यासाठी जोरदार कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक जण यासाठी कंबर कसून कामाला लागले असून मार्चअखेरपर्यंत बख्खळ माया जमविण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. बेळगाव जि. पं. कार्यक्षेत्रात 500 हून अधिक ग्राम पंचायती येतात. अनेक ग्राम पंचायती शहरानजीक असल्याने तेथील व्यवहारही मोठे होतात. प्रत्येक ग्रा. पं. कार्यक्षेत्रात अर्धवट कामे पूर्ण करण्याची सूचनाही पीडीओंना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. काही पीडीओंनी सदर कामांचे कंत्राट मर्जीतील कंत्राटदारांना देऊन आपली, अधिकाऱ्यांची आणि अध्यक्षांचीही टक्केवारी काढण्यात धन्यता मानत असल्याची जोरदार चर्चा आहे. यातच निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर माया गोळा करून काढता पाय घेण्यातच अनेकांनी धन्यता मानल्याचे दिसून येत आहे. सध्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सूत्रेही स्वीकारली आहेत.
कामांबाबत हालचाली गतिमान
‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असेच प्रकार सध्या तालुक्यात सुरू आहेत. दरम्यान, जिल्हा व तालुका पंचायतच्या इतर कामांबाबतही हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. ही सारी खेळी मार्चअखेरपर्यंत चालण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्चअखेर कामे पूर्ण करण्याची सर्व ग्राम पंचायतींच्या पीडीओंना सूचना देण्यात आली असली तरी ही माहिती गुप्त ठेवण्यासाठी पीडीओंनीही मौन पाळण्याचे पसंत केले आहे. मात्र, आता अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्यामुळे अनेकांनी कामे आटोपती घेऊन येथून काढता पाय घेण्यावरच भर दिल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.