जि. प. सीईओंचे आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश : आरोग्य समिती सभेत अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब : क्षयरोग, कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेऊन तत्काळ उपचार सुरु करण्याचे आदेश
प्रतिनिधी/कोल्हापूर
० ते ६ वयोगटातील सर्व मुलामुलींचे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी करण्यासाठी या वयोगटातील सर्व बालकांचे आधार कार्ड काढून त्यांच्या पालकांच्या मोबाईल क्रमांकाशी सात दिवसांत लिंक करावेत. आधारकार्डचे काम पूर्ण झाल्यानंतर १० दिवसांच्या आत हेल्थ कार्ड काढावे. यासाठी ग्रामपंचायतीचे डाटा ऑपरेटर व ई गव्हर्नर्सच्या डाटा ऑपरेटरची मदत घ्यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी आरोग्य विभागास दिले.
सीईओ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. आरोग्य समितीची सभा पार पाडली. यावेळी आरोग्य विभागाच्या अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब झाले. हेल्थ कार्ड नोंदणीची प्रक्रिया गतीमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, अंगणवाडी शाळांना लेखी सूचना द्याव्या, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : दुधाचे फॅट आणि वजनातील लूट थांबवा
ग्रामीण भागात सुरु असलेली हॉस्पिटल्स आणि क्लिनीकच्या नोंदणी परवाना प्रमाणपत्राची मुदत संपली असेल तर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र नुतनीकरणाबाबत हॉस्पिटल्सना नोटीस काढावी. नूतनीकरण नसलेल्या हॉस्पिटल्सवर कारवाई करावी. तसेच नवीन सुरु केल्या जाणाऱया हॉस्पिटल्स व क्लिनीकसाठी बॉम्बे नर्सींग ऍक्टचा प्रस्ताव विहीत नमुन्यात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत सादर करावा अशा सूचना सीईओ चव्हाण यांनी दिल्या.
कोल्हापूर जिल्ह्याचे गोल्ड कार्डसाठी नामांकन झाले असल्यामुळे संशयित कुष्टरोग व क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेमध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आशा, अंगणवाडी सेविका यांनी संशयित 5 टक्के रूग्ण जास्तीत जास्त शोधून नवीन रुग्णांचे वेळेत उपचार सुरु करावेत. त्याची नोंद निक्षय पोर्टल तसेच आवश्यक सर्व रजिस्टरमध्ये करावी, असे सीईओ चव्हाण यांनी सूचित केले.
नियमित लसीकरणांतर्गत ज्या बालकांचे, गरोदर मातांचे तसेच शाळेत जाणाऱ्या बालकांचे लसीकरण झालेले नाही, त्यांची यादी बनवून लसीकरण तत्काळ पूर्ण करा असे सीईओ चव्हाण यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील ऑपरेशन थिएटर बंद आहेत, ती त्वरीत सुरु करावीत असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दारिद्रय रेषेतील बाळंतीण आणि बाळांचा आरोग्य विभागामार्फत सर्व्हे करून त्यांचे डासांपासून संरक्षण व्हावे यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून नावीन्यपूर्ण योजना तयार करून त्यांना मच्छरदानी द्याव्यात असे आदेश सीईओ चव्हाण यांनी दिले.