बेंगळूर : कॉमेडियन वीर दासचा शो ‘हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतो’ असे सांगून हिंदू जनजागृती समितीने बेंगळूर येथे १० नोव्हेंबरला होणारा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. शहरातील व्यालीकवल पोलिस स्टेशनमध्ये या संबंधातील तक्रार दाखल झाली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे. “अशा वादग्रस्त व्यक्तीला बेंगळूरसारख्या संवेदनशील शहरात असा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देणे योग्य नाही. कर्नाटक राज्य आधीच जातीय आणि धार्मिक घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांना तोंड देत आहे. अशा शोमुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू शकतात. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे अशा कार्यक्रमांना परवानगी न देता हा कार्यक्रम त्वरित रद्द करावा” अशी मागणी हिंदूत्ववादी संघटनांनी केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेमध्ये झालेल्या शोमध्ये कॉमेडियन वीर दास यांनी ‘टू इंडियाज’ अशी टिप्पणी केली होती.