आशा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दिले निवेदन : कोरोना काळातील कामाचीही दखल घेण्याची आवश्यकता
प्रतिनिधी /बेळगाव
आशा कार्यकर्त्यां तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. ते वेतन देखील वेळेत दिले जात नाही. केवळ कंत्राट पद्धतीने काम करून घेतले जात आहे. तेव्हा आम्हाला वेळेत वेतन द्यावे तसेच कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, यासाठी आशा कार्यकर्त्यांनी एआययूटीयूसी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आशा कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
आरोग्य विभागातील विविध कामे, इतर सरकारी कामे घरोघरी जाऊन आशा कार्यकर्त्यां करत आहेत. मात्र वेतन तुटपुंजे दिले जात आहे. किमान मासिक 12 हजार रुपये वेतन द्यावे, तेही वेळेत. महत्त्वाचे म्हणजे आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोना काळातही आम्ही काम केले आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून आम्हाला सामावून घ्यावे अशी मागणी केली आहे.
वेतन नसताना काम करायचे कसे
गेल्या तीन महिन्यापासून वेतनच दिले नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वेतन नसताना काम कसे करायचे असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे. पोलिओ डोस, कोरोना लस, गर्भवती महिलांना पौष्टिक आहार व औषधे देणे यासह इतर कामे आम्ही करत आहे. आरोग्य विभाग विविध प्रकारची गणती देखील करण्यास दबाव घालत आहे. ही सर्व कामे आम्ही करत आहोत. तेव्हा तातडीने आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी होत आहे.
सरदार मैदानापासून मोर्चा काढण्यात आला. यामध्ये संपूर्ण जिल्हय़ातील आशा कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला होता. यावेळी डी. नागलक्ष्मी, लक्ष्मण जडगण्णावर, सुजाता काडमठ, गीता रायगोळ, लक्काप्पा बिजण्णावर यांच्यासह मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.