गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा : सायबर सुरक्षेला अधिक प्राधान्य देणार : तातडीने प्रक्रिया सुरु करणार
प्रतिनिधी/मुंबई
राज्यातील विविध विभागातील भरतीबाबत मागणी आणि आंदोलने होत असताना सोमवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने 20 हजार पोलीस कर्मचाऱयांची भरती केली जाईल, अशी घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना तरुणांनी अडवून पोलीस भरती सुरु करण्याबाबत निवेदन दिले होते. तथापि या तरुणांना त्यावेळी फडणवीस यांनी काहीही उत्तर दिले नव्हते. मात्र सोमवारी त्यांनी ही घोषणा करुन पोलीस भरतीसाठी इच्छुकांना तयारी करण्याचे संकेत दिले आहेत.
गृहविभागासह सायबर सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासह तुरुंग विभागात सुधारणा करण्याचेही त्यांनी सुतोवाच केले. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नवरात्रीच्या काळात आणखी एक दिवस मध्यरात्रीपर्यंत दांडिया खेळास परवानगी देत असल्याचे सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृहविभागाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. 2019 मधील 5297 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु आहे. पोलीस दलामध्ये भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 2020 मधील भरतीची प्रक्रिया सुरु आहे. अजून 7231 पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल.
हे ही वाचा : गेहलोतांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या अजय माकन यांचा कट, शांती धारीवालांचा आरोप
आधुनिकीकरणाचा फेरप्रस्ताव केंद्राला पाठवणार
राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणाचा फेर प्रस्ताव पेंद्र सरकारला पाठविण्यात येईल. सर्व पोलीस घटकांच्या आकृतिबंध मंजुरीचे प्रस्ताव 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. नवीन पोलीस स्टेशन निर्मितीसाठी एक सर्वंकष आराखडा तयार केला जाणार असून लोकसंख्या आणि तंत्रज्ञान हे आधारभूत मानण्यात येणार आहे. पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यातील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी पोलीस स्पोर्टस् अकादमीचा प्रस्ताव तयार केला जाईल, त्यासाठी योग्य निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
महिनाभरात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही
मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आले असून दुसऱया टप्प्याची कार्यवाही सुरु केली आहे. राज्यातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. साधारण महिन्याभरात हे कामकाज पूर्ण होईल. सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने असुरक्षित सागरी तळावर सीसीटीव्ही बसविण्याचाही विचार आहे. त्याकरताही लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाईल. नवीन बोटी खरेदी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्या अनुषंगाने पद भरती आदीचा प्रस्ताव तयार केला जात असून मंत्रिमंडळापुढे ठेवल्यानंतर त्याला तातडीने मंजुरी दिली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सायबर सुरक्षेला प्राधान्य
सायबर सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून त्यासाठीचा प्रकल्प सल्लागार नियुक्त केला जाईल. नागरिकांना अनेक सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत. सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. सध्याच्या नार्कोटिक कायद्यात काही सुधारणा अपेक्षित असून त्यासंदर्भात अभ्यास करुन अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईमध्ये डिटेंशन सेंटरचा प्रस्ताव तातडीने सादर करणे, राज्यामध्ये प्रशिक्षित श्वान पथक सज्ज करण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. तर राजकीय, सामाजिक आंदोलनातील, कोरोना काळातील, गणपती व दहीहंडी उत्सव काळातील खटले मागे घेण्यासंदर्भातील निर्णय निर्गमित करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
कारागृह विभागात सुधारणा
नवीन कारागफह निर्मिती करण्याबरोबरच कारागफह विभागात सुधारणा करण्यात येणार आहेत. राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी फेक माथाडी चळवळ फोफावत आहे. या फेक माथाडी तथा वसूली सम्राटांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित जिह्यातील पोलीस यंत्रणेला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
नवरात्रीत अजून एक दिवस 12 वाजपेर्यत परवानगी देणार
नवरात्र उत्सवात सध्या दोन दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत दांडीया खेळण्यास मान्यता देण्यात आहे. तथापि अजून एक दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यत मान्यता देण्याची मागणी झाली. मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवून लवकरच त्याबाबत निर्णय घेऊ व परवानगी देण्याचा प्रयत्न करु, असेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.