अध्याय तेविसावा
मनाबद्दल बोलताना भगवंत उद्धवाला म्हणाले, आत्मा जरी निष्क्रिय असला तरी मनाबरोबर राहून तो मनाला क्रियाशील करतो. सक्रिय झालेल्या मनाबरोबर एकरूप झालेला आत्मा जीवात्मा बनतो. मनाने निर्माण केलेल्या सुखदुःखाशी समरस होतो. मिथ्या संसार खरा समजून मनाला बरोबर घेऊन कर्मात आसक्त होऊन सुखदुःखाच्या कल्पनेने संसारात बांधला जातो. मनाचे कौशल्य आश्चर्यकारक आहे. ते शुद्ध अशा आत्म्याच्या ठिकाणी मीपणा उत्पन्न करते आणि त्याच ब्रह्माला जीवभाव लावून स्वतःच त्याला सगुणस्वरूपाला आणते.
मनाच्या संकल्पाचे सामर्थ्य इतके आहे की, ते शुद्ध ब्रह्माला अविद्यात्मक करून सोडते आणि त्रिगुणांची माळ लावून संसाररूप जाळे स्वतःच तयार करते.
ज्याप्रमाणे भांडय़ातील पाणी अलिप्त असलेल्या चंद्रबिंबाला आपल्यामध्ये भासमान करते, त्याप्रमाणे केवळ मनाच्या संकल्पाने ज्ञानस्वरूप आत्मा अविद्यात्मक केला आहे. भांडय़ातील पाणी हालले असता ते चंद्रबिंबही हलते आहे असे वाटते. त्याप्रमाणे मनातील विकारांमुळे शुद्ध ब्रह्माला जन्ममरण व सुखदुःखे उत्पन्न झालेली आहेत असे वाटते. आत्मा हा स्वयंप्रकाशी आणि ज्ञानस्वरूप आहे. मन हे जड असून कल्पनारूप आहे. तरी तेच आपले स्वरूप आहे असे मानून त्याचे पुण्य-पाप जीवात्मा स्वतः भोगतो. एखादा नट राजाचे काम करत असताना राजाच्या अधिकारात कृती करत असतो पण नाटक संपल्यावर जर तो राजासारखा वागू लागला तर त्या वागण्याचा त्याला त्रास होऊ शकतो तसंच जीवात्मा हा स्वतंत्र असला तरी मनाच्या प्रभावाखाली येऊन सुखदुःखरूपी त्रास भोगत असतो.
जिवात्म्याचा खराखरा आप्त, सुहृद व मित्र म्हंटला तर तो म्हणजे एक परमात्मा होय. तो मनाचा आणि जीवाचाही नियामक असून साक्षीदाराप्रमाणे एक प्रेक्षक असतो. जीवात्मा हा स्वतंत्र असल्याने राजासारखे स्वतःचे निर्णय घेऊ शकतो पण एखादा राजा जेव्हा गोडगोड बोलणाऱया प्रधानाच्या आहारी गेला तर स्वतःहून अडचणीत सापडतो. त्याप्रमाणे खरे पाहिले तर जीवात्मा हा मनाचा नियंता आहे पण तोच मनाशी एकरूप होऊन मनाच्या नसत्याच सुखदुःखांच्या व्याधी आपल्या माथी घेऊन सहन करतो. मनाने त्याला संसारी करून ठेवले आहे, त्यामुळे तो अनेक जन्ममरणे व रात्रंदिवस अनेक सुखदुःखे सोशीत असतो. थोडक्मयात जीवात्मा हा मनाच्या आहारी गेला असल्याने त्याला मनापासून वेगळा करण्यासाठी इतर उपाय करण्याची गरज असते. तो दुसरा उपाय म्हणजे, मनालाच निग्रह करायला लावणे हे शक्मय झाले तरच जीवाचे दुःख टळेल. अन्यथा मनाच्याच नादाने नाचत राहिले तर सर्व आयुष्य फुकट जाते. मनाचा निग्रह करण्यासाठी अनेक साधने आहेत. दान, स्वधर्माचे पालन, यमनियम, वेदाध्ययन, सत्कर्मे आणि व्रतांचे पालन ही सर्व कर्मे मनाचा निग्रह करण्यासाठी असतात कारण मनाची एकाग्रता हाच परम योग आहे. अर्थातच वरील गोष्टींचे पालन करत असताना आपण या गोष्टी मनोनिग्रह साधण्यासाठी करत आहोत याचे सतत भान ठेवावे लागते. अन्यथा वरील गोष्टी कितीही कसोशीने पाळल्या तरी त्या वाया जातात. मनोनिग्रहाचे उद्दिष्ट बाजूला ठेवून, जर एखादा त्या करत असेल तर त्यामागे नावलौकीक मिळवण्याची धडपड असते म्हणून मनोनिग्रहाकडे लक्ष न देता सर्वस्वही दान दिले, तर दाता काय तो एक मीच असा अभिमान होतो व त्या दानाच्या योगाने मन गर्वाने उन्मत्त होते. मनोनिग्रहाचे वर्म चुकून वर्णाश्रमधर्म आचरण केला असता त्याच्या योगाने मनोधर्म आनंदभराने बळावतो आणि ‘माझे स्वकर्म हेच अत्यंत श्रे÷’ असे वाटू लागते. त्रिभुवनात मीच काय तो एक आचारसंपन्न, मीच काय तो एक ज्ञानसम्पन्न, असे वाटून स्वधर्मादि आचरणाने मन अधिकच चवताळून जाते.
क्रमशः