55 शाळांचा सहभाग, लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजन : स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वितरण
प्रतिनिधी /बेळगाव
आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त लोकमान्य को-ऑप. सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम’ या समूहगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी थाटात झाले. स्पर्धेत बेळगाव उत्तर व दक्षिण या दोन विभागांमधील 55 शाळांमधील 561 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. शुक्रवारी लोकमान्य रंगमंदिर येथे उत्तर विभागातील स्पर्धा झाली.
लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, पुणे येथील उद्योजक कल्याण तावरे, लेखिका अद्वैता अमराणीकर, किशोर मासिकाचे संपादक किरण केंदे, सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक विठ्ठल प्रभू यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.
चेअरमन किरण ठाकुर यावेळी म्हणाले, 1882 मध्ये प्रसिद्ध बंगाली लेखक बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमठ येथे ‘वंदे मातरम’चा नारा दिला होता. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशवासीयांमध्ये स्फूर्ती व प्रेरणा निर्माण करण्यासाठी देशभक्तीपर गीते रचली जात होती. लोकमान्य सोसायटीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांमधील विविध शहरांमध्ये ‘वंदे मातरम’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुढील पिढीला स्वातंत्र्यवीरांचे स्मरण क्हावे व देशाभिमान वाढावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या देशातील विद्यार्थी स्वातंत्र्यगीते गुणगुणतात ते राष्ट्र बलवान होते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
देशाभिमान रुजवण्यासाठी अशा कार्यक्रमांची नितांत गरज
किशोर केंदे यांनी स्वातंत्र्य गीतांचे महत्त्व सांगत स्वातंत्र्य गीतांमुळे कशी क्रांती घडली हे उदाहरणासहित स्पष्ट केले. जगदीश कुंटे म्हणाले, पुढील भावी पिढीमध्ये देशाभिमान रुजवायचा असेल तर अशा कार्यक्रमांची नितांत गरज आहे. देशभक्तीपर गीतांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या देशाविषयीचे प्रेम वाढण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी अजित गरगट्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. त्यांनी लोकमान्य सोसायटीच्या प्रगतीचा आलेख उपस्थितांसमोर मांडला. परीक्षक म्हणून जगदीश कुंटे, किरण जोरापुरे, व नितीन कपिलेश्वरी यांनी काम पाहिले. मान्यवरांचे स्वागत सोसायटीचे बेळगाव रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी व असिस्टंट रिजनल मॅनेजर सी. आर. पाटील यांनी केले. समन्वयक विनायक जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वितरण
शुक्रवारी शहरातील उत्तर विभागात येणाऱया 26 शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. एकाहून एक सरस व तालबद्धरित्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा नारा दिला. मराठीसह कन्नड, हिंदी, उर्दु व गुजराथीमध्येही देशभक्तीपर गीते सादर केली. पहिल्या दिवशी झालेल्या स्पर्धेत प्रथम-अंगडी इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय-भरतेश सेंट्रल स्कूल हालगा व मराठी विद्यानिकेतन स्कूल, तृतीय महिला विद्यालय यांनी पटकाविला. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.