सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
शिलाँग / वृत्तसंस्था
भारतीय आणि हिंदू हे पर्यायी शब्द असून हे दोन्ही समाज एकच आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे. संघाचे एकमात्र ध्येय भारताचा चौफेर विकास हेच आहे, हे ही त्यांनी स्पष्ट केले. ते मेघालयची राजधानी शिलाँग येथे एका जनसभेत सोमवारी भाषण करत होते.
हिंदू या शब्दाची नेमकी एक व्याख्या करता येत नाही. हिंदू हा शब्द एक भू-सांस्कृतिक ओळख आहे. या शब्दाच विशिष्ट परिभाषा नाही. भारतीय आणि हिंदू हे एकच आहेत अशी संघाची मांडणी आहे. भारत हा एक प्रचीन देश आहे. त्याची स्वतःची एक ओळख आहे. ही ओळख आणि तिला जोडून येणारी नितीमूल्ये आपण विसरलो म्हणून एक हजार वर्षांची गुलामी आपल्या पदरात पडली. भारतातील सर्वच जण हिंदू आहेत. संघाच्या शाखेत प्रतिदिन एक तास याच प्राचीन नितीमूल्यांचे शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे आपल्या मातृभूमीसंबंधी असणाऱया आपल्या उत्तरदायित्वाचीही जाणीव संघशाखेवर होते. भारत मानवतेची सेवा करण्यावर विश्वास ठेवतो. आपण सर्व हिंदू एक आहोत ही भावना संघाच्या शाखेवर निर्माण केली जाते. याच भावनेतून भारत सरकारने अन्य गरीब देशांना कोरोनाच्या लसी पुरविल्या. तसेच आपला शेजारी देश श्रीलंका संकटात असताना त्याला आवश्यक ते साहाय्य केले, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पूर्वज महान होते
आपल्या सर्वांचे पूर्वज महान होते. त्यांनी मोठी कार्ये केली. त्यांनीच जगाला गणित, विज्ञान आणि वैद्यकशास्त्र यांचा पाया घालून दिला. संघाच्या आतापर्यंतच्या पाच पिढय़ांनी देशाच्या पुनर्निमाण कार्यात आपले महत्वाचे योगदान दिले आहे. संघाचे एकमेव ध्येय भारताचा चहुमुखी विकास हेच आहे. याच ध्येयाने गेली साधारणतः 100 वर्षे आम्ही कार्यरत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.