ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad Arrested ) आणि कार्यकर्त्यांनी ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या अटकेनंतर आपण जामीन घेणार नसून राज्य सरकारच्या सांगण्यावरून कारवाई केल्याचे आव्हाड यांनी म्हंटले आहे.
“आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो”, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले.

“मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल”, असेही ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

दरम्यान, ‘हर, हर महादेव’ चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे शिवाजी महाराजांची बदनामी झाली आहे. या बदनामीला विरोध करत असल्याने अटकेची कारवाई होत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे, सरकार मला शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगण्यापासून रोखत आहे, हे सरकार कोणाचे आहे हे स्पष्ट होत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले.