ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना रस्ता मोकळा करून देताना पोलिसांनी एका वाहन धारकांच्या कानशिलात लगावली. कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवरती हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मंत्रांच्या दौऱ्यासाठी सर्वसामान्यांवर पोलिसांची अरेरावी होत आहे. अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्यातून उमटत आहे. नेमका काय प्रकार घडला हे पाहूया.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड हे काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन परतताना त्यांचा ताफा वाहतुकीमध्ये अडकला. यावेळी रस्ता मोकळा करून देत असताना पोलिसांनी एका वाहनधारकांच्या कानशिलात लगावली. मात्र यात वाहनधाकराची काहीही चूक नसल्याचे बोलले जात आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
भाऊसिंगजी रोड हा नेहमीच गजबजलेला असतो. त्यातच काल रविवार असल्यामुळे या रोडवरती प्रचंड गर्दी होती. घडलेल्या या प्रकाराने कोल्हापुरात संताप व्यक्त केला जात आहे. वाहनधारकांच्या कानशिलात पोलिसांनी लगावली त्याची काहीही चूक नव्हती. तरीही पोलिसांनी अशी भूमिका का घेतली? ज्या पोलिसांने कानशिलात लगावली त्याच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न सर्वसामान्यांच्यातून उपस्थित होत आहे.