ओटवणे /प्रतिनिधी-
कारिवडे भैरववाडी नजीक वेताळ भाटले येथील काँक्रीटचा साकव शुक्रवारी सायंकाळी पुराच्या पाण्याबरोबर अक्षरशः वाहून गेला. या साकवावरून नारायण सावंत हे शेतकरी आणि एक महिला गेल्यानंतर अवघ्या एका मिनिटात हा साकव वाहून गेला. दैव बलवत्तर म्हणूनच या शेतकऱ्यासह महिलेचे प्राण वाचले. दरम्यान हा साकव वाहून गेल्याने वेताळ भाटले परिसराचा संपर्क तुटला असून आणि एन पावसाळ्यात या भागातील ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे.
सुमारे ४० वर्षांपूर्वी हा साकव बांधण्यात आला. त्यामुळे हा जिर्ण साकव निर्लेखित करून नवीन साकव अथवा ब्रिज बांधण्यासाठी या वाडीतील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला होता. सार्वजनिक बांधकाम खात्यानेही याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर हा साकव पुराच्या पाण्याबरोबर अक्षरशः वाहून गेला. दरम्यान या भागातील सुभेदार संजय सावंत यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडली असून यात या दोघांचा जीवही केला असता. ऐन पावसाळ्यातच साकव वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांसह शेतकरी व शाळकरी मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार त्यामुळे संबंधितांनी याची तात्काळ दखल घेऊन तात्पुरता साकव उभारावा तसेच नवीन साकव अथवा ब्रिजसाठी आतापासूनच कार्यवाही करावी अशी मागणी सुभेदार संजय सावंत केली आहे.दरम्यान या नविन साकवाचा प्रस्ताव बांधकाम खात्याकडे पाठवण्यात आला असुन अधिकाऱ्यांनी पाहणीही केल्याचे सरपंच अपर्णा तळवणेकर यांनी सांगितले.