सुरक्षा उपाय योजनाचा अभवा, संबंधितांचे दुर्लक्ष, जनतेतून संताप
म्हासुर्ली / वार्ताहर
धामणी खोऱ्यातील प्रमुख मार्ग असलेल्या कळे- म्हासुर्ली या प्रमुख मार्गावरील पन्हाळा तालुक्यातील सुळे – कोदवडे व वेतवडे ते पणोरे दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारांनी वाहतूकीच्या दृष्टी योग्य उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.परिणामी रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
कळे (ता.पन्हाळा) ते म्हासुर्ली (ता.राधानगरी) हा धामणी खोऱ्यातील प्रमुख मार्ग असून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते असल्याने सततची वर्दळ असते. याचीच दखल शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतल्याने गेल्या काही वर्षापासून खोऱ्यातील रस्त्यांचे रुंदीकरण सुरू केले आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यात सुळे ते कोदवडे व वेतवडे ते पनोर गावांच्या दरम्यान रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नवीन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खुदाई करण्याचे काम करण्यात आले आहे.मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदार कंपनीने प्रवाशी जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याच उपाय योजना केल्या नसल्याने सदर रस्ता अपघातास निमंत्रण देणार ठरत आहे.
रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही ठिकाणी खोल खुदाई करण्यात आली आहे.मात्र सुरक्षेच्यादृष्टीने रस्त्यांच्याकडेला रिफ्लेक्टर फित अथवा फलक लावलेले नाहीत.परिणामी या ठिकाणाहून रात्री प्रवास करताना जीव मूठीत घेऊन जावे लागत आहे.तसेच सध्या कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू असल्याने ऊसाने भरलेले ट्रक, डबल ट्रॉलीचे ट्रॅक्टर व इतर वाहना चालकांना येथील रस्त्याचा अंदाज येत नसून कसरत करतच वाहने चालवावी लागत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने उपायोजना केली नसल्याने मोठा अनर्थ घडण्याची भिती जनतेतून व्यक्त होत आहे.
सदर मार्गावरून रात्री व पहाटे शहराकडे नोकरी धंद्या कामासाठी जाणारे अनेक चाकरमानी,युवक ही प्रवास करत असल्याने त्यांची सुरक्षा ही धोक्यात आली आहे. मात्र या सर्व प्रकाराकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. तरी सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.