मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय ः संकेश्वर पोलिसांकडून तपास सुरू
प्रतिनिधी/ संकेश्वर
घराजवळ खेळणाऱया 14 वर्षीय मुलाला तुमच्या घरातील एकजण आजारी असल्याचे सांगून त्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना मंगळवार दि. 2 रोजी रात्री 8 वाजता संकेश्वर येथे घडली. दोन दिवसांपूर्वीच आणखी मुलाला फूस लावून घेऊन जात असताना नागरिकांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा डाव फसला होता. आता तर अपहरण झाल्याने संकेश्वर शहरासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत आहे. साई भास्कर काकडे (वय 14, रा. संसुद्द माळी गल्ली, संकेश्वर) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, मंगळवारी रात्री साई घराच्या अंगणात खेळत होता. त्यावेळी त्याला हेरून काही अज्ञातांनी साईकडे येऊन तुमच्या घरातील एकजण निपाणीला आजारी आहे, असे सांगून त्याला सोबत घेऊन गेले. बराच वेळ झाला तरी साई घराकडे कसा आला नाही म्हणून कुटुबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, साई कोठेही आढळून आला नाही. दरम्यान, एकजण आपण साईला गाडीतून घेऊन जाताना काही अज्ञातांना पाहिले असल्याचे सांगितले. यावरून साईचे अपहरण झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर कुटुंबीयांनी साई बेपत्ता झाल्याची तक्रार संकेश्वर पोलिसात दिली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच दोन दिवसांपूर्वीच शहरातील वड्डर गल्लीत अज्ञाताने एका मुलाला फूस लावून आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तेथे असलेल्या नागरिकांनी त्याला अडवून मुलाला कोठे घेऊन जात आहेस? असा प्रश्न केला. यानंतर त्याने कोणतेही उत्तर तेथून पळ काढल्याचे समजते या घटनेची गंभीर दखल घेत संकेश्वरचे पीएसआय गणपती कोगनोळे यांनी साईच्या तपासाठी रवाना झाले आहेत. परिसरात मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचे शक्यता असल्याने आपल्या सहकाऱयांसह कोल्हापूर, सांगली परिसरात साईचा शोध घेणार आहे. लवकरात लवकर साईचा शोध घेऊन या प्रकरणातील संबंधितांना जेरबंद करणार असल्याचे कोगनोळे यांनी सांगितले.
टोळी सक्रिय?
दोन दिवसांपूर्वी एका मुलाला फूस लावून घेऊन जाण्याचा प्रयत्न व आता साईचे अपहरण, या दोन घटना पाहिल्यात तर संकेश्वर परिसरात मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त आहे. ही टोळी मुलांना काहीतर सांगून आपल्यासोबत घेऊन जात आहे. त्यामुळे पालक व कुटुंबीयांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच बाहेर खेळणाऱया मुलांवर नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर गल्लीत येणाऱया प्रत्येक अनोळखीवर लक्ष ठेवण्याचीही गरज आहे.