माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे गौरवोद्गार : अंकली येथे कार्यक्रम : मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी /चिकोडी
अनेक वर्षांपासून डॉ. प्रभाकर कोरे या भागात सहकार, शिक्षण क्षेत्रात कार्य करत आहेत. त्यांच्यामुळेच केएलईचा विस्तार जगातील अनेक देशात झाला आहे. दर्जेदार शिक्षणासाठी त्यांच्या संस्था अग्रेसर आहेत. उसाची केवळ साखर करून चालणार नाही, हे जाणून त्यांनी डिस्टीलरी, वीज प्रकल्प सुरू केले. संस्था कशा चालवाव्यात याचे उदाहरण म्हणजे डॉ. कोरे आहेत. साखर निर्यातीमुळे 40 हजार कोटीचे चलन देशाला मिळाले असल्याचे राज्यसभा सदस्य व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगितले.
अंकली येथील डॉ. प्रभाकर कोरे पेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन, अंकली येथील वीर राणी चन्नम्मा पुतळय़ाचे अनावरण तसेच चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल व मद्यार्क निर्मिती प्रकल्पाची शंकूस्थापना अशा संयुक्त कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशावर इंग्रजांचे वर्चस्व होते. त्यांच्या विरोधात महिलाही लढल्या व विजयी झाल्या. त्यात प्रथम नाव राणी चन्नम्मा यांचे आहे, स्वाभिमानासाठी युद्ध करून त्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई व राणी चन्नम्मा यांचे ऋण कोणीही विसरू नये.
डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मी त्यांना भेटलो. तेव्हापासून आपले जवळचे नाते आहे. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात सहकार चळवळ विस्तारली. कोणत्याही क्षेत्रात त्यांचे कार्य अनमोल आहे. देशातील साखर उद्योग टिकून रहायला पवार कारणीभूत आहेत. प्रामुख्याने त्यांनी देश व शेतकऱयांच्या हितासाठी
आपले आयुष्य वेचले असल्याचे सांगितले.
डॉ. कोरे व्यक्ती नसून शक्ती
यावेळी बोलताना सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी डॉ. कोरे व्यक्ती नसून शक्ती आहेत, राज्यभर त्यांच्या सहकाराचे साम्राज्य विस्तारले आहे.
लाखो लोकांना संस्थेच्या माध्यमातून आधार दिला आहे. राज्यातील 33 लाख शेतकऱयांना यंदा 26 हजार कोटी कर्ज वितरण करण्यात येणार आहे. यशस्विनी पुन्हा कार्यरत करणार आहे. तसेच 26 लाख दूध संघांतील सदस्यांना कार्ड वितरण करणार असल्याचे सांगितले.
डॉक्टरेट पदवी सार्थकी लागली
माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले, संशोधन व त्यात यश यामुळे डॉ. कोरे यांना देण्यात आलेली डॉक्टरेट पदवी सार्थकी लागली आहे. सहकार व शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अविस्मरणीय असल्याचे सांगितले.
विधानपरिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी रत्नाप्पाण्णा कुंभार व आप्पनगौडा पाटील यांनी सहकारी चळवळीचा पाया रचला, साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱयांच्या उसाला योग्य दर दिला जात असल्याचे सांगितले. वन व अन्न नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनीही मनोगत व्यक्त केले. चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्यावतीने भव्य हार घालून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सांगलीचे खासदार संजय पाटील, आमदार गणेश हुक्केरी, आमदार दुर्योधन ऐहोळे, आमदार अनिल बेनके, राजू कागे, राज्य सौहार्द फेडरेशनचे अध्यक्ष बी. एच. कृष्णरेड्डी, उपाध्यक्ष जगदीश कवटगीमठ, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी खासदार अमरसिंह पाटील, माजी आमदार काका पाटील, गणपतराव पाटील, सुकुमार पाटील, चंद्रकांत कोठीवाले, पराप्पा सवदी, कारखान्याचे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, अजित देसाई, बाळगौडा रेंदाळे, परसगौडा पाटील, संदीप पाटील, नंदकुमार नाशिपुडी, चेतन पाटील, मल्लाप्पा म्हैशाळे, एनसीपी राज्याध्यक्ष हरी आर, चिदानंद कोरे कारखान्याचे अध्यक्ष भरतेश बनवणे, डॉ. प्रभाकर कोरे पेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे महांतेश पाटील, सिध्दगौडा मगदूम, पुतळा समिती अध्यक्ष सुरेश पाटील, सर्व संस्थांचे संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. कोरे संस्थेच्या संचालिका डॉ. प्रीती दोडवाड यांनी स्वागत, व्यवस्थापक देवेंद्र करोशी यांनी अहवाल वाचन केले. आर. टी. देसाई यांनी आभार मानले.