ग्रोबझ ट्रेडींगच्या पाच संचालकांवर गुन्हा
प्रतिनिधी/कोल्हापूर
ग्रोबझ ट्रेडींग, ग्रोबझ वेल्फेअर आणि ग्रोबझ निधी या तीन कंपन्यांतील गुतंवणूकीवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 42 लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या 14 जणांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याप्रमाणे पाच संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फसवणूकीची रक्कम कोटीत जाण्याची शक्यता आहे.
कंपनीचे प्रमुख विश्वास निवृत्ती कोळी (वय 45, रा. बावची, ता. वाळवा, सांगली), उज्वला शिवाजी कोळी (रा. यशोधा विश्वास कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत), सौरभ कोळी (वय 25, रा. बावची), सोमनाथ कोळी (वय 40), ग्रामसेवक स्वप्नील शिवाजी कोळी (वय 38, रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. एप्रिल,2022 पासून संशयित पसार झाले आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
विश्वास कोळी याने जानेवारी 2021 मध्ये शाहूपुरी चौथी गल्ली येथे कार्यालय सुरु केले. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एजंट नेमले. केलेल्या गुंतवणुकीवर 10, 15, 20 टक्के व्याज देण्यास प्रारंभ केला. 1 लाख रुपये गुंतवणूक करणाऱयास प्रत्येक महिन्याला 10 हजार व्याज मिळत होते. 18 महिने व्याज घेतल्यानंतर गुंतवणूकदारास 1 लाख रुपये परत केले जात होते. अशा प्रकारे पाच जणांनी कोल्हापूर, सांगली, बेळगाव येथील शेकडो गुंतवणूकदारांकडून लाखो रुपये गोळा केले.
हे ही वाचा : दारु तस्करांना मोका लावणार; मंत्री शंभूराजे देसाई
एप्रिल, 2022 पर्यंत गुंतवणूकदारांना परतावा मिळत होता. मात्र त्यानंतर पैसे मिळणे बंद झाले. गुंतवणुकदारांनी पैशाची मागणी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फिर्यादी रघुनाथ खोडके (वय 32, रा. हारपवडे, पन्हाळा) यांच्यासह 14 गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी 69 लाखाची गुंतवणूक केली होती. त्यातील 28 लाख 61 हजाराचा परतावा मिळाला. त्यानंतर पैसे देणे बंद झाले. त्यांची 42 लाखांची फसवणूक झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले पुढील तपास करीत आहेत.
गुंतवणुकदारांचे पैशासाठी हेलपाटे-
ग्रोबझमध्ये सुमारे 1 हजार जणांनी गुंतवणुक केली आहे. गुंतवणुकीचा हा आकडा कोटीत जाण्याची शक्यता आहे. कोळी आणि त्याच्या लोकांनी सुरुवातीला क्रूझ टूर्स, आलिशान गाडय़ांचे आमिषे दाखवून गुंतवणुक करण्यास भाग पाडले. या आमिषाला सर्वसामान्यांनी आपल्या कष्टाची पुंजी गुंतवली. गेल्या दहा महिन्यापासून परतावा मिळण्याचे बंद झाल्याने गुंतवणुकदार हवालदिल झाले असून ते पैशासाठी हेलपाटे मारत आहेत.