केंद्र सरकारचा निर्णय; दहा टक्के उताऱ्याला मिळणार प्रतिटन 3050 रुपये
कोल्हापूर : प्रतिनिधी
चालू वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022-2023 गळीत हंगामासाठी केंद्र सरकारने एफआरपीमध्ये उसाच्या वाजवी व किफायतशीर किमतीत (एफआरपी) टनास बेसिक 10 टक्के उताऱ्यास 150 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. तोडणी आणि वाहतुकीचे 725 वजा जाता 2325 रुपये मिळतील. कोल्हापुरातील सरासरी उतारा 12.50 टक्के आहे. त्यामुळे कोल्हापुरातील शेतकऱयांना वाहतूक तोडणी खर्च वजा जाता 3011 रुपये प्रतिटन मिळतील.
कृषीमुल्य आयोगाने एफआरपीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री गटाने सहमती दर्शविली होती. एफआरपीमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावावर मंत्रीमंडळाने शिक्कामोर्तब केले. मागीलवर्षी एफआरपीच्या दरात 100 रुपयांची वाढ केली होती. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) साखर हंगाम 2022-23 साठी उस खरेदी दरात 150 रुपयांची वाढ करण्यास मान्यता दिली. 10.25 टक्के रिकव्हरी असलेल्या उसाचा मुलभूत खरेदी दर आता 3050 रुपये असेल यातून तोडणी वाहतूक वजा जाता 2315 रुपये मिळतील. 12 टक्के रिकव्हरीच्या उसाला सर्व खर्च वजा जाता 2859 रुपये प्रतिटन मिळतील. तर 13 टक्के रिकव्हरी असलेल्या उसाला 3164 रुपये मिळणार आहेत.
ही शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने केली आहे. कोल्हापूर जिह्यातील उसाची सरासरी रिकव्हरी साडेबारा टक्के आहे. त्यामुळे टनापाठीमागे सरासरी दोनशे रुपये शेतकऱयाला जादा मिळतील. मागील वर्षी सरासरी 140 लाख मे. टन उसाचे उत्पादन झाले होते. यंदा त्यात दहा टक्के वाढ होवून 150 मे. टनापेक्षा अधिक उस उत्पादन गृहीत धरले आहे. वाढीव एफआरपीमुळे जिह्यातील शेतकऱ्यांना पैसे भागवताना मात्र कारखान्यांची दमछाक होणार आहे.
असे आहे गणित वाढीचे गणित
टक्के रिकव्हरी…. 10.25….. 11.50…. 12… 12.50…. 13
प्रतिटन वाढीव दर.. 3050 ….. 3431…..3584 ….3736….3889
725 रुपये खर्च वजा… 2325….. 2706…. 2859…..3011…..3164