कसबा बीड / प्रतिनिधी
चैत्र पौर्णिमा हा खूप मोठा ज्योतिबा यात्रेचा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात उत्साहाने साजरा होतो. या यात्रेनंतर दुसऱ्या पाकळीच्या खेटयापर्यंत ज्योतिबा डोंगरावर गुलाल धुऊन जाण्यासाठी लागतो पाऊस या प्रचलित लोक वाक्याचा संपूर्ण कोल्हापूर जिल्हा प्रत्यय आला. विजेची कडकडात व सोसाट्याचा सुटणारा गार वारा याच्या साक्षीने ज्योतिबा डोंगरापासून संपूर्ण दक्षिण भाग यामध्ये कोल्हापूर कसबा बीड, पाडळी खुर्द, कोगे, महे, शिरोली दुमाला आदी सर्व गावांमध्ये ज्योतिबाच्या दिशेकडून सोसाट्याचा वारा व पाऊस आला. उन्हाळ्याने त्रस्त झालेला संपूर्ण भाग थंडगार झाला.
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा यात्रेवेळी महाराष्ट्र कर्नाटक व इतर भागातून जवळपास दहा लाखाच्या पटीत भाविक येतात. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं… या नावाच्या गजराने गुलाल खोबऱ्याची उधळण, सासन काठी वाद्याच्या तालावर नाचवत यात्रा उत्साहात साजरा होते. यावेळी संपूर्ण ज्योतिबा डोंगरावरती मुख्य मंदिरासह सगळीकडे गुलालच गुलाल होतो. हा पडलेला सर्व गुलालाचा खच स्वच्छ होण्यासाठी जोतिबा देवाच्या आशीर्वादाने जोरदार पाऊस लागून हा गुलाल धुतला जातो, ही गेली अनेक वर्षे होणारी सत्य घटना व भाविकांना आलेला अनुभव याचाच एक भाग आहे. आज आलेल्या पावसाने जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने लहान-मोठे आबालवृद्ध असणाऱ्या भाविकांना समाधान वाटले.