जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तरुण मंडळांचा संभ्रम दूर करावा
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सण उस्ताहाने साजरे करा, असे आवाहन केले आहे. असे असताना प्रशासनातील विविध घटक व लोकप्रतिनिधी यांच्या भूमिका स्पष्ट नसलेने तरुण मंडळे व सर्वसामान्य जनतेत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे गणेश उत्सव साजरा करण्याच्या नियमावलीत स्पष्टता यावी, यासाठी जिल्हाधिकार्यांनी सर्व संबंधित प्रशासकिय विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक त्वरीत घ्यावी, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेतर्पे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच गणेशोत्सवात प्रशासनाकडून कोणताही दबाव चालणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदनातील मागण्या अशा, गणेशोत्सव खड्डेमुक्त व वाहतूक कोंडीमुक्त व्हावा यासाठी प्रशासनाकडून कोणत्या उपायोजना केल्या हे जाहीर करावे, गणेशोत्सव आवाजाची मर्यादा सर्व धर्मीयांना दिलेल्या सवलतीनुसार व्हावी, तसेच साऊंड सिस्टिम मुक्तीची सक्ती प्रशासनाने करू नये, पारंपारिक मार्गाने गणेश विसर्जन पंचगंगा नदीत वाहत्या पाण्यात करावे, ज्या मंडळांना इराणी खणीत विसर्जन करायचे आहे त्यांना ते करू द्यावे. कोणावरही सक्ती करू नये. गणेशोत्सव काळात विद्युत पुरवठा व पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, प्रशासनाने गणेशोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा होण्यासाठी जनतेच्या भावना समजून घेऊन काम करावे, तसेच येणारा उत्सव जनतेच्या हातात हात घालून दबाव तंत्राचा वापर न करता साजरा करावा.
शिष्टमंडळात किशोर घाटगे, संभाजी साळुंखे, चंद्रकांत बराले, संजय कुलकर्णी, मनोहर सोरप, दुर्गेश लिंग्रस, शिवानंद स्वामी, लक्ष्मीबाई काशीद, अक्षय ओतारी, नंदू घोरपडे आदींचा समावेश होता.