वारणानगर / प्रतिनिधी
पाच वर्षाच्या भिमाशंकर अशोक नागोळी व तीन वर्षाच्या स्वराज विष्णू काईगडे या दोन बालकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे घडली. यातील तीन वर्षाचा स्वराज काईगडे हा गंभीर जखमी झाला असून त्याचेवर सोपीआर हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत.
सलग दोन दिवस दोन बालकांवर कोडोलीतील चावडी परिसरात भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केलेने परिसरात घाबराटीचे वातावरण पसरले असून ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थातून होऊ लागली आहे.
या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोडोली येथील नागोबा मठा जवळ सिमेंट वीट बनवण्याचा कारखान्यात मोल मजुरी करणारे कुटुंब राहते. त्यातील पाच वर्षाचा ‘भीमाशंकर तेथे खेळत होता. त्यावेळी सहा सात कुत्र्याची झुंड तेथे आली. त्या पैकी एका कुत्र्याने भीमाशंकर वर हल्ला केला त्यावेळी तेथे असलेल्या नागरिकांनी त्याची कुत्र्या पासून त्याची सुटका केली. यात तो जखमी झाला होता. घरच्यांनी व शेजारच्या नागरिकांनी त्याला तातडीने कोडोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास चावडी भागातील स्वराज काईगडे (वय ३) या घरासमोर खेळत असलेल्या बालकावर अचानक दहा ते बारा मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांनी हाता- पायांचा चावा घेतला आहे. सात ठिकाणी लचके तोडले आहे. स्वराजच्या आरडाओरड्याने तेथीलच वैशाली पाटील या महिलेने धाडसाने कुत्र्यांच्या तावडीतून स्वराजची सुटका केली. त्यानंतर कुत्र्यांनी वैशाली पाटील यांच्याकडे आपला मोर्चा वळविला. तोवर गल्लीतील लोक धावून आले. त्यानंतर कुत्र्यांनी तेथून पळ काढला. गंभीर जखमी स्वराजला तातडीने कोडोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यामध्ये स्वराज गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.
सलग दोन दिवस दोन मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केलेने परिसरात घाबराटीचे वातावरण पसरले असून ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.