प्रवाशांतून नाराजीचा सूर
विश्वास पाटील / हेरे
चंदगड-तिलारी राष्ट्रीय मार्गाचे काम सुरू आहे. या कामाच्या मंजुरीला दोन वर्षे उलटली अजून शासनाच्या व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे काम रेंगाळले आहे. त्यामुळे संतप्त प्रवाशीवर्गातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.
गेल्या दोन वर्षापूर्वी गारगोटी ते तिलारी या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळाली आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे काम थांबवण्यात आले होते. टेंडरचा कालावधी वाढवून देण्यात आला होता. पण नंतरच्या काळात वेळोवेळी ठेकेदाराने कामात हयगय केल्याने अद्याप चंदगड-तिलारी मार्ग रखडला गेल्याने प्रवासी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही दिवसापूर्वी पहिल्या ठेकेदाराला बाजूला करून नवीन ठेकेदारांना काम विभागून देण्यात आले आहे. नवीन टेंडर घेतलेल्या कंपनी ठेकेदाराने आपल्या सवडीनुसार कामाला सुरुवात केल्यामुळे हा मार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. हेरे ते तिलारीपर्यंत मागील दोन वर्षात संपूर्ण झाडांची कत्तल करून रस्ता रुंदीकरण केला गेला. बाजूच्या साईट पट्टय़ांची खुदाई करण्यात आली. रस्ता होणार या आशेने प्रवासीवर्ग सुखावला होता. पण वेळोवेळी काम बंद या ठेकेदाराच्या भावनेमुळे या मार्गाची वाहतूक जोखमीची बनली आहे. या मार्गाला रोज अपघात होत असून बाहेरून ये-जा करणाऱया पर्यटक प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. तिलारी घाटातून चांगल्या प्रकारचा दर्जेदार रस्ता झाला आहे. मग घाटानवरील चंदगडपर्यंतचा मार्ग का खोळंबला? असा प्रश्न आता या मार्गाने प्रवास करणाऱया सर्वसामान्य प्रवाशांना पडत आहे. सध्या पावसाळय़ाचे दिवस सुरू होणार आहेत. म्हणजे पुन्हा काम बंद पश्चिम भागात चार-पाच महिने सतत पाऊस पडतो. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत रस्त्यांचे काम करणे गरजेचे असते. पण या उलट मे महिन्याच्या अखेरीला काम करतो आहे, असा दिखाऊपणा करण्यात येत आहे. हा मार्ग अपूर्ण राहिला तर त्याचे परिणाम खुदाई केलेल्या साईट पट्टय़ांमध्ये पाणी साचून तळय़ाचे स्वरूप येईल. असा अंदाज आहे. अपघातांना चालना मिळेल. लाल माती रस्त्यावर येऊन वाहने घसरतील. अपघाताचे परिणाम भयानक असतील. याचे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारांना काही वाटत नाही का? असा प्रश्नही आता विचारला जात आहे. यासंबंधी परिसरातील गावातील लोकप्रतिनिधींनी आंदोलने केली. सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारला. ठेकेदारांना घेराव घातला. त्यातून तात्पर्य काही निघाले नाही. किंवा ते प्रश्न सुटले नाहीत. ठेकेदारांनी आपल्या सोयी व सवडीप्रमाणे केलेले काम सर्वसामान्यांच्या जीवावर बेतणारे आहे. घाट परिसरातून व आजुबाजूच्या ग्रामवस्तीतून चंदगडला नित्यनेमाने येणारा नोकरदार वर्ग, शेतकरी याशिवाय सर्वसामान्य प्रवासी जीवघेणा प्रवास करत आहेत. रस्ता होणार कधी? या रखडलेल्या कामाला जबाबदार कोण, याची चर्चा जोरात सुरू आहे. या उखडलेल्या रस्त्यामुळे खुदाई केलेल्या साईट पट्टय़ामुळे पाठीचे दुखणे, आजारांना आमंत्रण मिळत असून रस्त्यातील चढ-उतारामुळे खड्डय़ांमुळे चांगली वाहने नादुरूस्त होत आहेत. तालुक्मयातील बरीच मंडळी दोडामार्ग-गोवा परिसरात कामाला आहेत. काही मंडळी नित्यनेमाने ये-जा करतात तर काही आठवडय़ातून सुट्टीच्यावारी गावाकडे फिरतात. घाटापासून मार्ग चांगला आहे. मग आपल्या तालुक्मयातीलच मार्गाची ही अवस्था? काही दिवसापूर्वी हेरे ते मोटणवाडी या रस्त्याला खड्डे बुजवण्यासाठी पॅचीस मारण्यात आले. त्यामध्ये फक्त दिखाऊपणा करून संबंधित खड्डे बुजवण्याचा नुसता बहाना करण्यात आला. हेरे परिसरातील प्रवाशांनी खड्डे बुजवण्याचे असतील तर व्यवस्थित भरा, नाही तर चालते व्हा? अशा शब्दात सूचना केल्या. काही ठिकाणी मोहरीची कामेही सुरू आहेत. दोन्ही बाजूला चर मारून त्या ओढय़ानाल्यांमध्ये पाईप घालून पाण्याचा मार्ग मोकळा केला जात आहे. पण तिथे कामाची पातळी योग्य नसल्याचे बोलले जात आहे. सर्व बाबी बघितल्या तर विचारणार कोण? शासकीय यंत्रणेला जाग येणार कधी? सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार, अशा बाबींमुळे या गोष्टींना ऊत येत आहे? चंदगड तालुक्मयातील पारगड, तिलारी परिसर पर्यटनाचे मुख्य ठिकाण असून गोवा कर्नाटक व अन्य या शहरातून या परिसरात पर्यटक दाखल होत असतात. वर्षा पर्यटनासाठी या परिसरात पर्यटकांची मांदियाळी असते. रखडलेले रस्ते यामुळे पर्यटन विकासालाही मोठी खीळ बसणार आहे.