राष्ट्रीय राजधानीत नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर कॉंग्रेससह देशातील अनेक पक्षांनी बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे. कॉंग्रेसच्या या निर्णयावर जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी टिका केली आहे. संसदेच्या उद्घाटनाला विरोध करून काँग्रेस पक्ष केवळ काही लोकांची मते मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा >>> कुमारस्वामी यांच्या टिकेनंतर शिवकुमार यांचे प्रत्युत्तर;…त्यामुळे कुमारस्वामींना हे विसरू नये
केंद्रातील भाजप सरकारने संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित न केल्याने हा आदिवासी समाजाचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच भाजपच्या या कृतीवर कॉंग्रेसने देशभरात निषेध पुकारला असून उद्घाटन समारंभाच्या उपस्थितीवर बहिष्कार टाकणार आहेत.
कॉंग्रेसच्य़ा आदिवासी समाजाचा अपमान केल्याच्या भुमिकेला उत्तर देताना कुमारस्वामी म्हणाले कि, “काँग्रेस पक्ष बहिष्काराचे आवाहन करून राजकीय धोका निर्माण करत आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या इमारतीचे उद्घाटन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या हस्ते झाले, मात्र त्यांनी राज्यपालांना निमंत्रित केले नव्हते. कर्नाटकातही विकास सौंधाचे उद्घाटन झाले तेव्हा तत्कालीन राज्यपालांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. अशा मुद्द्यांवर राजकारण करणे अयोग्य आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते 28 मे रोजी होणाऱ्या संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळ्यास काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि इतरांसह 20 पक्षांनी एक संयुक्त निवेदन जारी करून बहिष्काराची घोषणा केली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन संसदेचे उद्घाटन करण्याचा निर्णय ‘लोकशाहीवरील हल्ला’ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.